आष्टी/कडा (जि. बीड) : समुद्रात वाहून जाणारे पाणीगोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही.
दुष्काळ (Drought) हा भूतकाळ होईल. एवढेच नव्हे तर चार नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रदेखील दुष्काळमुक्त (Drought free) होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ(Godavari Marathwada Irrigation Development Corporation), छत्रपती संभाजीनगर आष्टी उपसा सिंचन योजनेचा क्र. ३ अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी तसेच बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (५ फेब्रुवारी) रोजी झाला.
यावेळी जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, आ. नारायण पाटील आदींची उपस्थिती होती.
सर्व योजना सोलारवर
सर्व उपसा सिंचन योजना (Irrigation Scheme) सोलारवर टाकल्या जातील. त्यामुळे वीज बिलाचा बोजा शेतकऱ्यांवर (farmer) येणार नाही. जी १६ हजार मेगावॉट वीज लागते ती सर्व सोलरवर घेतली जाईल. याचे काम डिसेंबर २०२५ किंवा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे ८ रुपये युनिटऐवजी ३ रुपयाने वीज मिळून ५ रुपये वाचतील, असेही फडणवीस म्हणाले.
पाइपलाइन कामाची पाहणी करून बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. उपसा सिंचन कामासाठी ११ हजार ७२६ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. हे काम दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात ३३ हजार ४९५ हेक्टर आणि दुसऱ्या टप्यात ८७ हजार १८८ हेक्टरचे काम होईल.