बालय्या स्वामी
हिंगोली जिल्ह्यात सरासरी ९४५ मिलिमीटर, म्हणजेच तब्ब्बल १२६ टक्के पाऊस झाला. बहुतांश मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने तब्बल २ लाख ७१ हजार ५८६ पेक्षा अधिक हेक्टरवरील पिके आडवी झाली आहे. अजूनही शेतात पाणी साचून असल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून तर पावसाने मुक्काम ठोकला आहे.
दररोज दोन ते तीन मंडळात अतिवृष्टी होत आहे. ढगफुटीसदृश्य पावसामुळे नदी, ओढ्यांना कायम पूर पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली असून, पिकेही आडवी पडली आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी पीक हातचे गेले असून, हळद पीकही अखेरची घटका मोजत आहे.
आतापर्यंत तब्बल सरासरी ९४५ मिलिमीटर म्हणजेच १२६ टक्के पाऊस कोसळला. यात ऑगस्ट महिन्यात जिरायती, बागायती, तसेच फळ पीक मिळून तब्बल २ लाख ७१ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत.
पंचनाम्यांना अडथळे
• जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
• सध्या पाणी मात्र, सध्या शेतात पा पंचनाम्यासाठी शेतात आणेही अवघड झाले आहे. त्यामुळे बहुतांश पिकांचे पंचनामे अजून झाले नाहीत.
'जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा'
• जिल्ह्यात पावसाने कहरच केला आहे. सप्टेंबर महिन्यात, तर पावसाने मुक्कामच ठोकला आहे.
• त्यामुळे सर्वच पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पुढे येत आहे.
चोरजवळा शिवारात काही दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. यात सोयाबीन, कापूस, हळद, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. - गजानन शिलार, चोरजवळा.
ऑगस्टमधील पिकांचे तालुकानिहाय नुकसान
हिंगोली - ५९१०४ औंढा ना. - ४२७४६ वसमत - ५३३०० सेनगाव - ६३६५१ कळमनुरी - ५२७८५
अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसला असून कोणतेच पीक हाती लागणार नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी. - समाधान टापरे, साटंबा.