Join us

आठ दिवसांपासून पोर्टल बंद पडल्याने अवकाळीचे अनुदान अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:53 AM

अनुदान कधीपर्यंत मिळेल याबाबत शंका

जयेश निरपळ

गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळीने बाधित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. निवडणुकीच्या तोंडावर या अनुदानाचे बँकांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण देखील सुरू झाले होते; मात्र गत दहा दिवसांपासून पोर्टल बंद असल्याने अनुदान वाटप थांबले आहे. आतापर्यंत केवळ ४४ हजार शेतकऱ्यांना २४ कोटी रुपये वितरित झाले आहेत.

पोर्टल अनिश्चित काळासाठी बंद पडल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात असून उर्वरित अनुदान कधीपर्यंत मिळेल याबाबत शंका उपस्थित केली जात असताना त्यात आता पुन्हा अवकळीच्या तडाख्याने बळिराजा पूर्ता हतबल झाला आहे. २०२३ च्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात काढणीला आलेल्या खरिपासह रब्बी हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोवळी पिके होते.

पाण्याखाली जाऊन जागीच सडल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी पंचनामे करून मदतीची मागणी केली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ६४ हजार १९४ शेतकऱ्यांचे १ लाख ४८ हजार ३६८.४१ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. तर यासाठी २० जानेवारी रोजी २०६ कोटी रुपयांची मागणी प्रस्तावाद्वारे करण्यात आली होती.

यासाठी शासनाकडून जिल्ह्यासाठी ३१ जानेवारी रोजी २०६ कोटीचा निधी मंजूर करून त्याचे प्रत्यक्ष वाटप फेब्रुवारीच्या मध्यापासून  थेट मंत्रालय स्तरावरून करण्यात येत होते.

हेही वाचा - शेतीतल्या लेकींनो! शिळे अन्न खाल्ले तर आरोग्य बिघडणार; व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे

२ लाख २० हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

निधी मंजुरीच्या आदेशानंतर अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रत्येक तालुका प्रशासनाकडून अपलोड केल्या जातात. त्यानंतर शेतकऱ्यास एक विशिष्ट क्रमांक मिळतो. तेव्हा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी लागते.

त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा होते; मात्र मागील दहा दिवसापासून सदरील वेबसाईट बंद पडल्याने अनुदान वितरण थांबले आहे. अनुदान पात्र २ लाख ६४ हजार १९४ शेतकऱ्यापैकी दिड महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत केवळ ४४ हजार शेतकऱ्यांना २४ कोटी निधी प्राप्त झाला आहे. अद्याप २ लाख २० हजार शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

पोर्टल नेमके कधी सुरू होईल, कोणी सांगेना

याविषयी जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता लवकरच पोर्टल सुरळीत होऊन अनुदान वितरण सुरू होईल अशी माहिती देण्यात आली; मात्र पोर्टल नेमके केव्हा चालू होईल, याबद्दल कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हक्काच्या अनुदानासाठी वाट अनुदानास पाहावी लागत आहे.

गत अवकाळीची नुकसानभरपाई सर्व शेतकऱ्यांना मिळाली नसतांना आता पुन्हा जिल्ह्याच्या काही भागात अवकळीने झोडपले यामुळे रब्बीच्या पिकांना मोठ्या तडाखा बसला आहे. त्यामुळे प्रलंबित अनुदान वाटप त्वरित सुरू करण्याची मागणी लाभधारक शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

टॅग्स :पीक विमाशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनपीकसरकारमहाराष्ट्र