हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, चार पिकांसाठी ३० जूनची मुदत ठेवण्यात आली आहे.
तर, अन्य पिकांसाठी १४ व ३१ जुलै अशी मुदत असेल. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी, तसेच अॅग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.
फळपीक विमा योजना मृग बहार २०२५ साठी शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी विमा पोर्टल www.ncip.gov.in सुरू झाले आहे. केंद्र सरकारने सुरुवातीला लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा या चार पिकांसाठी १४ जून ही सहभागाची मुदत दिली होती.
मात्र, ही मुदत ३० जून करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या मुदतवाढीला विमा कंपन्यांनी सहमती दर्शविली असून, केंद्र सरकारही मुदतवाढ देईल, असे आवटे यांनी स्पष्ट केले. याच योजनेत मोसंबी व चिकू पिकासाठी ३० जून तर डाळिंबासाठी १४ जुलै व सीताफळासाठी ३१ जुलै अशी मुदत असेल.
फळपिकांच्या उत्पादनावर कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता यांसारख्या हवामान घटकांचा विपरीत परिणाम होतो. या योजनेतून अशा नैसर्गिक परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा उतारा, ई-पीक पाहणीतील जिओ टॅग फोटो, तसेच ई-पीक पाहणी बंधनकारक आहे.
ई-पीक पाहणी नोंद नसल्यास पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो. ही ई-पीक नोंदणी पीक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चार फळपिकांसाठी १४ जूनची मुदत होती. ती ३० जूनपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे. त्याला मान्यता मिळेल. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक, प्रक्रिया व नियोजन, पुणे.
फळपिकांचे जिल्हे, विमा कंपन्या
• भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) - जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, रत्नागिरी.
• फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी - जालना.
• युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी - छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार.
• बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी - ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलडाणा, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशिम.
हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा