Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खरिपासाठी बियाणे आणि खतांचीही मुबलक उपलब्धता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 09:13 IST

अहमदनगर : हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यादृष्टीने कृषी विभागानेही ...

अहमदनगर : हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यादृष्टीने कृषी विभागानेही तयारी सुरू केली असून आवश्यक खते व बियाणे वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

वेळेत पावसाचा अंदाज वर्तवला गेल्याने खरिपाच्या क्षेत्रात १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा खरिपासाठी ६ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले गेले आहे. त्यासाठी कृषी विभागाने ८३ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केलेली आहे.

जिल्ह्यात १५ जून ते १५ ऑगस्ट हा खरीप हंगाम पेरणीचा कालावधी असून जिल्ह्याच्या भौगोलिक रचना आणि होणाऱ्या पर्जन्यमानानुसार खरीप हंगामातील पिकांची निवड झालेली आहे. यात दक्षिण जिल्ह्यात प्रामुख्याने कडधान्य पिके घेतली जातात.

तर उत्तरेतील अकोले आणि पारनेर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीन, कपाशीचे पीक घेण्यात येते. नगर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात खरिपाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे.

खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असून, या दोन पिकांमुळे कमी कालावधीत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. याशिवाय भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद या पिकांनाही पसंती देतात.

पेरा वाढणारजिल्ह्यात सरासरी ५ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यात वाढ होत आहे. मागील वर्षी ५ लाख ८६ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा त्यात १५ टक्के वाढ होऊन ६ लाख ७५ हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे व स्वतांचीही आगाऊ मागणी करण्यात आली आहे.

युरियासह सर्वच खते मुबलकसन २०२४ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एकूण २ लाख ८० हजार टन खतांची मागणी शासनाकडे केली. त्यातील २ लाख ३२ हजार आवंटन मंजूर झाले आहे. दरम्यान, यात मागील वर्षीची शिल्लक १ लाख २४ हजार ७२५ टन आहे. १ एप्रिलपर्यंत २५५८ टन खत प्राप्त झाले. आतापर्यंत त्यातून ४ हजार ५२६ टन खतांची विक्री झाली. त्यामुळे सध्या १ लाख २२ हजार ७५७ टन खते उपलब्ध आहेत. तर उर्वरित खते मागणीनुसार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळाली.

६० टक्के बियाणे सोयाबीनचे पेरा वाढणार असल्याने कृषी विभागाने यंदा बियाणांची अधिकची मागणी नोंदवली आहे. यंदा खरिपासाठी ८२ हजार ८४९ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून यात सर्वाधिक ४९ हजार ८७५ क्विंटल म्हणजे ६० टक्के बियाणे केवळ सोयाबीनचे आहे. त्याखालोखाल मक्याचे १३ हजार २००, भाताचे ५ हजार ५४०, बाजरीचे २९७५, तर कपाशीचे बियाणे अडीच हजार क्विंटल असेल.

टॅग्स :खरीपशेतकरीशेतीपेरणीपाऊसखतेसरकारपीकसोयाबीन