भीमानगर : प्रेरणादायी शेतकऱ्यांसाठी ठरेल अशी यशोगाथा कन्हेरगाव येथील प्रगतिशील शेतकरी विकास दशरथ माने यांनी आपल्या डाळिंबशेतीतून साकारली आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर व सूक्ष्म नियोजन करून तीन एकर डाळिंब बागेतून एकरी २६ ते २८ टन उत्पादन मिळाले असून, तब्बल २७ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. माने यांनी साधा भगवा जातीच्या डाळिंबाची जुलै २०२० मध्ये लागवड केली आहे.
माजी समाजकल्याण सभापती व प्रगतशील बागायतदार शिवाजी कांबळे यांनी नुकतीच माने यांच्या बागेस भेट देऊन त्यांच्या यशाचे कौतुक केले.
शेणखत, दुहेरी ठिबक संच, मर रोग नियंत्रण आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर यामुळे चांगले उत्पादन आले आहे.
परंतु शासनाने पुढाकार घेऊन जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिले पाहिजे व निर्यातक्षम उत्पादन कसे काढावे, याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असे शिवाजी कांबळे म्हणाले.
एका झाडापासून ७० किलो डाळिंब◼️ शेतकरी माने म्हणाले की हवामानाचा अंदाज घेऊन बहार धरला.◼️ एका झाडापासून ७० किलोपर्यंत डाळिंब मिळाले.◼️ एका डाळिंबाचे वजन ६८० ग्रॅमपर्यंत आहे.
यावेळी कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, प्रगतिशील शेतकरी अरुण लोकरे, गोरख राऊत, चंद्रकांत कदम, धनाजी क्षीरसागर, रितेश डोके पाटील उपस्थित होते.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर