Join us

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून १,४३५ शेतकरी बनले उद्योगपती; हा जिल्हा राज्यात अग्रेसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:52 IST

शेतकऱ्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी आणि ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाउद्योग योजना' अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरली आहे.

संदेश हजारेजवळा : शेतकऱ्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी आणि ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाउद्योग योजना' अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरली आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मागील तीन वर्षात १४३५ अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या नाशवंत शेतीमालाचे अधिक मूल्य मिळावे आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.

सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५०१ नवीन लाभार्थ्यांना यंदा वर्षभरात लाभ मिळवून देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षात तब्बल १४३५ अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यात आली आहे.

यामध्ये दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग ३९०, फळे व भाजीपाला प्रक्रिया ४२७, कडधान्य प्रक्रिया १३०, पशुखाद्य प्रक्रिया ७१, तेलबिया प्रक्रिया ५५, बेकरी प्रक्रिया ५५ तसेच इतर प्रकारचे उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहेत.

किती अनुदान मिळेल?- वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के जास्तीत जास्त दहा लाख रुपये मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे.शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीकरिता बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देय आहे.

पात्र प्रकल्पनाशवंत शेतीमाल जसे फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके दुग्ध व पशू उत्पादन, किरकोळ वन उत्पादने इत्यादींमध्ये सद्यःस्थितीत एक जिल्हा एक उत्पादन प्रकल्पात नसलेल्या उत्पादनामध्ये कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे स्तरवृद्धी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण या लाभासाठी पात्र असतील.

शेतकऱ्यांचा शेतीमाल आता थेट प्रक्रिया उद्योगात रूपांतरित होतो आहे, ज्यामुळे त्यांना अधिक मूल्य मिळत आहे. त्याचबरोबर ग्रामीण युवक-युवतींना स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत आहेत. ही योजना सामाजिक परिवर्तनाचेही प्रभावी माध्यम ठरत आहे. - रवींद्र घुले, तालुका कृषी अधिकारी, जामखेड

अधिक वाचा: सांगली व कोल्हापूरच्या तुलनेत गुजरातमध्ये उसाला मिळतोय कसा दर; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीकाढणी पश्चात तंत्रज्ञानअहिल्यानगरपीककेंद्र सरकारसरकारकृषी योजनाव्यवसायअन्न