Join us

चाहूल लागताच 'बर्ड फ्ल्यू'ला रोखण्यासाठी 'या' जिल्ह्याने उचलले पहिले पाऊल; आठ 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' ठेवणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 17:23 IST

Bird Flu : राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. तर विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात अजूनही शिरकाव झालेला नाही. तरीदेखील या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. तर विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात अजूनही शिरकाव झालेला नाही. तरीदेखील या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. यासाठी ८ 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' तयार करण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सुमारे दीड ते दोन लाख कुक्कुट पक्षी असून, ते सुरक्षित आहेत.

जिल्ह्यात आठ ते दहा वर्षांपूर्वी बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला होता. त्यावेळी कुक्कुट पक्षी मृत झाले होते. यात व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान झाले हाते. सध्या तरी जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाला नसला तरी मागील काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. नुकतच चंद्रपूर जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. अनेक कुक्कुट पक्षी मृत्यूमुखी पडल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे माहिती पडली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातही या रोगाला रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून आवश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत.

व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून 'वॉच'

• बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे.

• आठही तालुक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या ग्रुपमधून आवश्यक त्या सूचना केल्या जात आहेत.

• पक्ष्यांमध्ये असाधारण मृतक दिसून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करावा.

• मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये, परस्पर विल्हेवाट लावू नये, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात ४० पोल्ट्री फार्म

वर्धा जिल्ह्यात जवळपास ३५ ते ४० पोल्ट्री फार्म असून, सुमारे दीड ते दोन लाख कुक्कुट पक्षी असल्याची माहिती आहे. सर्व पक्षी सहाः स्थितीत सुरक्षित आहेत. नागरिकांनी घाबरु नये.

जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू आजाराचे कुक्कुट पक्षी अद्याप आढळलेले नाहीत. मात्र, सतर्कता म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी एक अशा आठ रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केल्या आहेत. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. कुक्कुट पक्षी मृत आढळ आल्यास पशुवैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क करावा. अन्न शिजवूनच खावे, जेणेकरुन विषाणू निष्क्रिय होतात. - डॉ. पुंडलिक बोरकर, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, वर्धा.

रोगाची लक्षणे...

भूक मंदावली, उदासिनता, अंडी उत्पादन कमी होणे, शिंकणे व खोकणे, डोळ्यातून पाणी येणे, डोक्यावर सूज येणे, पंख नसलेला भाग निळसर पडणे

असा होतो संसर्ग

• जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बर्ड फ्ल्यू हा कुक्कुट पक्ष्यांना विषाणूमुळे होणारा रोग असून, संसर्गजन्य आहे. यात सर्वात संसर्गजन्य 'स्ट्रेन एच ५ एन १' आहे. 'एव्हिएन इन्फ्ल्युएन्झा' या विषाणूचे अ, ब, क असे तीन प्रकार आहेत. अ विषाणू हा कुक्कुट पक्षी, अन्य पक्षी, प्राणी तसेच मानवांमध्ये आढळत असून, विषाणू बी व सी फक्त मानवांमध्ये आढळतो.

• या विषाणूद्वारे रोग उदभवण्याचा कालावधी २४ तास ते १४ दिवसांचा आहे. या विषाणूचा प्रसार एका कुक्कुट पक्ष्यातून दुसऱ्या कुक्कुट पक्ष्यांमध्ये मुख्यतः हवेतून व स्थलांतरित पक्षी, वन्य पक्ष्यांच्या माध्यमातून होतो.

अन्न शिजवून खावे

आहाराच्या पद्धती लक्षात घेता तसेच अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास या रोगाचा विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले.

हेही वाचा : Farmer Success Story : आधुनिक शेती तंत्रज्ञानाने साधली प्रगती; गोपालरावांची ८ एकरात ४८ लाखांची कमाई

टॅग्स :पोल्ट्रीबर्ड फ्लूशेतकरीविदर्भशेती क्षेत्र