नाशिक : राज्यात वाढत चाललेल्या उष्णतेमुळे सर्वसामान्य जनजीवनासह पोल्ट्रीव्यवसायावरही गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून, या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे.
उष्माघातामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. काही पोल्ट्री फार्ममध्ये दररोज सुमारे ५० ते ८० कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषतः बंदिस्त शेडमध्ये वाढणाऱ्या कोंबड्यांना उष्णतेमुळे त्रास होत असून, त्यांचे आरोग्य बिघडत आहे.
तापमानाचा कोंबड्यांवर होणारा परिणाम
- कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात.
- इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्यांचे सामान्य शरीर तापमान मूलतःच अधिक (१०३ ते १०७ डिग्री फॅरानाईट) असते.
- कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते,
- परंतु ते २८ ते ३० अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकतात. त्यांच्या उत्पादनात फारसा फरक पडत नाही.
- परंतु ३० अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास त्याचा त्यांच्या उत्पादन आणि प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
- बाह्य तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास प्रति अंश तापमान वाढीने ५ टक्के उत्पादन घट होते.
मागील काही दिवसांपासून उष्णता खूपच वाढली आहे. शेडमध्ये तापमान खूप वाढत असल्यामुळे कोंबड्यांना उष्माघात होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोंबड्या दगावत आहेत. आम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पोल्ट्री व्यवसाय टिकवणे सध्या कठीण झाले आहे. या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी.
- बाळू भरसट, पोल्टी व्यावसायिक
