Join us

हवामान बदल, जलप्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:52 AM

सातत्याने होणारे हवामानातील बदल, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि वाढत्या जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस माशांचा साठा कमी होत चालला आहे.

सातत्याने होणारे हवामानातील बदल, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि वाढत्या जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस माशांचा साठा कमी होत चालला आहे. कधी काळी राज्याच्या सागरी जलाधिक्षेत्रात मुबलक मिळणारी मत्स्यसंपदा आणि तिच्यावर उपजीविका करणाऱ्या लाखो मच्छिमारांना मासळीच्या दुष्काळाशी झुंजावे लागत आहे.

सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत. त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत असून, काही प्रजाती स्थलांतर करत आहेत.

तापमान वाढीमुळेही माशांसह समुद्रातील जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहे. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये झीरो ऑक्सिजन झोन निर्माण झाले आहेत.

अनेक प्रजाती धोक्यात• घोळ, जिताडा, शेवंड, बोंबील, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे याचबरोबर इतर अनेक प्रजातींचे समुद्रातील अस्तित्व मागील काही वर्षापासून कमी झाले आहे.• यावर कहर की काय, बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी मासेमारीचा होणारा अतिरेक याचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छिमारांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे.

मासेमारी व्यवसायावर पुन्हा संकट• या उद्योगातील नौकांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मासेमारीसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करून खर्च केलेली रक्कमही वसूल होत नसल्याने मच्छिमारांचा नौका विकण्याकडे कल वाढत चालला आहे. तसेच हंगामात अनेक नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीचे दिवस वाया जात असल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.• सरकारने सागरी मासेमारीचे संवर्धन, व्यवस्थापन आणि विकास ब्लू इकॉनॉमीच्या माध्यमातून करण्याचेही ठरवले आहे. मत्स्योत्पादन वाढीबरोबर निर्यातवृद्धीसाठी मागील काही वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात बऱ्यापैकी आर्थिक तरतूदही केली जात आहे.

सागरी हद्दीत वाढली घुसखोरी• राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून कोट्यवधींची मत्स्यसंपदा हडप करणाऱ्या कर्नाटक, गुजरात राज्यांतील हायस्पीड ट्रॉलर्सनीही राज्यातील पारंपरिक मच्छिमाराचे जगणे कठीण करून टाकले आहे.• यामुळे परराज्यांतील यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांवर प्रतिबंध घालण्याची व अवैध पर्ससीन, एलईडी मासेमारीवरील बंदी केवळ कागदावरच राहिली आहे.• गेल्या काही वर्षापासून मासळीची घटती उत्पादकता आणि नौकांची कमी होणारी संख्या यामुळे मासेमारी व्यवसायावर गंडांतर आल्याचे फिशर काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी सांगितले.

टॅग्स :मच्छीमारपाणीप्रदूषणजल प्रदूषणहवामान