अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाने दिल्यामुळे देवगड तालुक्यातील सुमारे ८६४ परवाना नौकाधारक व मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे.
देवगड तालुक्यामध्ये अनेक गावे समुद्रकिनारी व खाडीकिनारी वसलेली आहेत. यामुळे या नवीन मत्स्य थोरणामुळे मच्छीमार बांधवांना व मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांना एक चालना मिळणार आहे.
देवगडची आर्थिक नाडी ही आंबा, मासे व पर्यटनावर अवलंबून आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळेच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्यांचे मच्छिमार बांधवांकडून अभिनंदन देखील करण्यात येत आहे.
देवगड तालुक्यामध्ये विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये, पुरळ, हुर्शी, कलंबई, फयासे, पडवणे, देवगड, मिठमुंबरी, कुणकेश्वर, कातवण, तांबळडेग, मुणगे, हिंदळे, मोर्वे ही गावे समुद्रकिनारी येतात तर वाडातर, वाघोटण, कालवी, मोंड, पडेल, तिलॉट, मळई, मणचे, मुटाट, वानिवडे या गावांना खाडी लाभलेली आहे.
यामुळे देवगड तालुक्यामध्ये बहुतांश मच्छीमार बांधव मत्स्य व्यवसायावर आपल्या उदरनिर्वाह करतात. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना वीज दरामध्ये सवलत मिळणार आहे. मत्स्य क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच कृषी दरानुसार कर्जसहाय्य मच्छिमारांना मिळणार आहे.
मत्स्य शेतीला अल्प दरात विम्याचादेखील फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांप्रमाणे सौरऊर्जाबाबतचे लाभ मच्छीमार बांधवांना मिळणार आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अॅक्वाकल्चर मत्स्य शेती करण्यासाठी मच्छिमारांना लाभ मिळणार आहे.
शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी मत्स्य व्यावसायिकांना अनुदान मिळणार आहे. मत्स्य व्यवसायामध्ये नीलक्रांती घडून तरुणांना रोजगार मिळणार आहे. उपकरणे, यंत्रेदेखील सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. सागरी व अंतर्गत मासेमारी क्षेत्रामध्ये आर्थिक विकासदेखील होणार आहे.
रोजगाराचे दालन उपलब्ध होणारदेवगड तालुक्यामध्ये मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होऊन मच्छीमार व मत्स्यपालन करणाऱ्या मच्छिमारांची आता संख्या वाढणार आहे. तालुक्यामध्ये अनेक बचत गटांच्या माध्यमातून खाडीमध्ये खेकडा पालनदेखील केले जात आहे. या व्यवसायालादेखील चालना मिळणार आहे. तालुक्यामध्ये कोलंबी, खेकडा प्रकल्प अनेक ठिकाणी केले जात जात आहेत. कृषी क्षेत्राप्रमाणे मत्स्य व्यवसायाला सवलत मिळणार असल्याने मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांची संख्या आता वाढून एक रोजगाराचे दालन निर्माण होणार आहे.
व्यावसायिकांना लाभ मिळणारमच्छिमारांना शासनातर्फे रिलीफ पॅकेजदेखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे मच्छिमारांना मत्स्य बीज, खाद्य खरेदी, पॅरल व्हिल, एअरेअर्स, एअरपंप करिताही अनुदान, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना नुकसानभरपाई मिळणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांना होणार आहे.
छोट्या मच्छिमारांना चांगला फायदादेवगड तालुक्यातील अनेक गावे खाडी व समुद्रकिनारी वसलेली आहेत. खेकडे पकडण्यासाठी वाडातर, कलंबई, केळयेवाडी, पडेल येथे खाडीकिनारी छोटे-मोठे मच्छिमार हे खेकडे पकडण्यासाठी पिंजरे तयार करून खेकडे पकडतात. यामुळे छोट्या मच्छिमारांना फायदा मिळत आहे. काही समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये खेकडे पकडण्यासाठी मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तसेच कोळंबी प्रकल्पदेखील देवगड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आहेत. या व्यवसायाला आता कृषीसारखा दर्जा मिळाल्याने अनेक अनुदानात्मक शासनाचा लाभ मच्छीमार बांधवांना मिळणार आहे.
मत्स्य व्यावसायिकांना चालना- बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मत्स्य व्यवसायाचे नवनवीन धोरण निर्माण करून मत्स्य व्यवसायाला ऊर्जितावस्थेतमध्ये आणण्याचे काम केले आहे.- देवगड तालुक्याची आर्थिक नाडी आंबा, मत्स्य व पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मत्स्य व्यवसाय हा कर्जाच्या खाईत अडकला होता. मात्र आता नवीन मत्स्य धोरणामुळे मत्स्य व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये चालना मिळणार आहे.
अधिक वाचा: Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर