Agriculture News : उन्हाळ्यात, उष्णतेचा ताण आणि निर्जलीकरण यासारख्या मोठ्या समस्या जनावरांसाठी घातक ठरतात. उष्णतेच्या ताणामुळे जनावरांमध्ये पाण्याची कमतरता भासू लागते. आणि जेव्हा जनावरांमध्ये पाण्याची कमतरता (water Stortage) असते. तेव्हा त्यांना डिहायड्रेशनची समस्या भेडसावू लागते.
उन्हाळ्यात (Summer) जनावरांना किती पाणी प्यायला द्यावे, याचे एक निश्चित प्रमाण असले तरी, अनेक वेळा अज्ञानामुळे किंवा दुर्लक्षामुळे प्राण्यांना त्यांच्या गरजेनुसार पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत, जनावरांमधील पाण्याची कमतरता भरून काढण्याचे कसब हिरवा चाऱ्यामध्ये असते. ते कसे याबाबत नेमकं जाणून घेऊयात....
राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या (National Livestock Mission) माध्यमातून उन्हाळ्यात जनावरांची काळजी याबाबत सल्ला दिला जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे हिरवा चाऱ्याबाबत. एक किलो हिरव्या चाऱ्यामध्ये सरासरी तीन ते चार लिटर पाणी असते. जनावरांना पाणी देण्यात शेतकरी कमी पडला तर हिरव्या चाऱ्यातून ही कमतरता भरून निघते. फक्त शेतकऱ्यांनी हिरव्या चाऱ्याची तजवीज करणे आवश्यक ठरते.
गायी आणि म्हशींना पिण्यासाठी ३० ते ७० लिटर पाणी लागते.दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींना भरपूर पाणी लागते. कारण पाण्याच्या कमतरतेचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो. जर गाय दूध देत असेल तर तिला दिवसभरात किमान ३० ते ५० लिटर पाणी पिण्याची गरज आहे. तर जर म्हशी दूध देत असेल तर तिला दिवसभरात ४० ते ७० लिटर पाण्याची आवश्यकता असते.
उन्हाळ्यात विहिरीतून घेतलेले सर्वसाधारण पाणी पिण्यासाठी द्यावे. जर नळाचा पुरवठा असेल तर ते पाणी गरम नाही ना हे तपासून घ्यावे. तसेच सामान्य तापमानाचे पाणी जनावरांसमोर स्वच्छ टाकी किंवा भांड्यात ठेवावे, जेणेकरून जेव्हा तहान लागेल तेव्हा तो त्याच्या गरजेनुसार तहान भागवतील.
पाण्याचे फायदे
- पाणी चारा आणि अन्न पचवण्यास मदत करते.
- शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होतात.
- शरीरातून अवांछित आणि विषारी घटक मूत्राद्वारे बाहेर काढले जातात.
- उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास पाणी मदत करते.
- दुधात सुमारे ८५ टक्के पाणी असते, म्हणून एक लिटर दुधासाठी अडीच लिटर पाणी लागते.