Satyajit Tambe: सत्यजीत तांबेंनी घेतली शिंदे-फडणवीसांची भेट; सांगितलं भेटीमागचं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:02 PM2023-02-28T12:02:08+5:302023-02-28T12:08:30+5:30

विधान परिषद निवडणुकांपासून काँग्रेसचे निलंबित नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली व यात ते विजयी झाली.

विधान परिषद निवडणुकांपासून काँग्रेसचे निलंबित नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली व यात ते विजयी झाली.

आमदार तांबे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सत्यजीत यांनी एका ट्विटमध्ये कविता शेअर केली होती. या कवितेवरुन तांबे आता काँग्रेसमध्ये परतणार नसल्याची चर्चा सुरू झाली.

उडतीच्या पाखरांना परतीची तमा नसावी, रोज नवी दिशा असावी... अशी ही कविता होती. या कवितेवरुन चर्चा सुरू झाल्यानंतर स्वत: सत्यजीत यांनी स्पष्टीकरण दिले.

मी एका शाळेच्या स्नेहसंमेनाला गेलो होतो, त्या ठिकाणी एका मुलाने ही कविता वाचून दाखवली ती कविता मला आवडली म्हणून मी ट्विट केली. यातून कोणताही अर्थ काढण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने प्रथमच आमदार बनून सत्यजित तांबे सभागृहात पोहोचले आहेत. मात्र, पहिल्याचदिवशी तांबे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली.

सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपल्या मागण्याही मांडल्या आहेत. जुनी पेन्शन, सरकारी नोकर भरती, औद्यगिक वसाहतींच्या काही समस्या, क्रिडा विद्यापीठ सारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.

मुख्यमंत्री शिंदेंनी लवकरच या संदर्भात वेळ देऊन स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केले आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा केल्याचे ताबेंनी म्हटले.

दरम्यान, सत्यजित तांबे यांच्य उमेदवारी गोंधळावरुन काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील शीतयुद्ध महाराष्ट्राने पाहिले.

तर, भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे सत्यजित तांबे विजयी झाल्याचे भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, आता शिंदे-फडणवीस भेटीमुळे पुन्हा राजकीय चर्चा रंगत आहेत.