मुख्यमंत्र्यांनी फक्त निर्णयाला स्थगिती दिलीय, पण...;लोकल प्रवासाबाबत टोपेंने दिले महत्त्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:40 PM2021-08-03T14:40:25+5:302021-08-03T15:10:53+5:30

सर्व दुकान व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे मुंबईत ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व दुकान व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा सुरू होण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी सुधारित परिपत्रक जारी केले.

मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवरपासून शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. सध्या चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असलेल्या दुकानांच्या वेळेमध्ये वाढ करून देण्याची मागणी मंजूर करण्यात आली आहे.

कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असल्याने मुंबईतील निर्बंध मंगळवारपासून काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय महापालिकेने रात्री उशिरा घेतला. मात्र महानगर क्षेत्रातील अनेक भागांत रूग्णसंख्या घटत नसल्याने लोकल वाहतूक तूर्त बंदच राहणार आहे. लसींचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी न्यायालयात मांडण्यात आली.

मुंबईची लोकल सामान्य प्रवाशांसाठी बंद राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी केले जातील. त्यातून होणाऱ्या फायद्या-तोट्यांचा अभ्यास करून निर्बंध शिथिल करायचे की, वाढवायचे याचा निर्णय होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईची लोकल सामान्य प्रवाशांसाठी बंद राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी केले जातील. त्यातून होणाऱ्या फायद्या-तोट्यांचा अभ्यास करून निर्बंध शिथिल करायचे की, वाढवायचे याचा निर्णय होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना लोकल प्रवासवरील बंदी कायम ठेवल्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, लोकल रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलेलं नाही. त्यांनी हा निर्णय तूर्तास स्थगित केलेला आहे.

दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीनं मागणी होत आहे. मागण्या होत आहेत, पण होणारे परिणामही मुख्यमंत्र्यांनाच बघावे लागतात, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

मोठ्या संख्येनं लोक लोकल रेल्वेतून प्रवास करतात, मग हे शक्य होईल का? ते कशापद्धतीने तपासता येईल? या सगळ्या बाबी आहेत. यात घाईगडबड करणं शक्य नसतं. घाईत असं केलं गेलं, तर कोरोनाच्या दृष्टिकोनातून याचे दुष्परिणाम खूप मोठे होऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलेलं नाही. निर्णय स्थगित केलेला आहे. पण संबंधित सर्व लोकांशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतीलच, असं राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर पुन्हा एकदा राज्यांत निर्बंध लावण्यात आले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनाही लोकल ट्रेनने प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली होती.