होळीच्या दिवशी भांग पिणार असाल तर या 10 गोष्टींचा नक्की विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 07:29 PM2018-03-01T19:29:28+5:302018-03-01T19:29:28+5:30

होळी हा सण म्हणजे विविध रंगांचा आणि भांगेच्या धुंदीचा. होळीच्या रंगांना आणखीनच धुंद करण्याचं काम ही भांग करते. भांग बनवण्यासाठी चरसचा उपयोग काही शीतपेयातून किंवा पदार्थातून केला जातो. तसंच होळीच्या दिवशी भांगेचा अंश असलेल्या पदार्थांमध्ये मिठाई, थंडाई, पकोडे, लाडू आणि सरबतांचा समावेश असतो. मात्र, भांगेची नशा उतरण्यास बराच वेळ लागतो. म्हणून यंदा होळीला जर भांग पिणार असाल तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

१) कोणत्याही अनोळख्या ठिकाणी भांग पिऊ नका. होळीच्या उत्साहात आपण बऱ्याचदा मित्रमंडळींसोबत रमून जातो. पण याच उत्साहाचा फायदा दुसरे घेऊ शकतात. भांग प्यायल्यावर बऱ्याच जणांना झोप येते व नंतर उठल्यावर तुमची बॅग व मोबाइल किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता असते.

२) कोणत्याही दुकानात भांग विकत घेताना विचार करा. होळीच्या दिवशी काही ठराविक दुकानांमध्येच भांग मिळते. पण रस्त्यावर किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या भांगमध्ये घातक रसायनं असू शकतात. तसंच स्वस्त असणाऱ्या भांगेमध्ये कृत्रिम रंगाचाही समावेश केलेला असतो. म्हणून भांग विकत घेताना काळजी घ्या.

३) भांग पिणे म्हणजे नशा करणे नाही. भांग प्यायल्यावर त्याचा प्रभाव कोणत्याही नशेपेक्षाही जास्त काळ असतो. त्यामुळे भांग प्यायल्यावर होणारी नशा प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. काहींना झोप येते तर काहींना विचित्र हालचाल व भास जाणवू लागतात. भांगेचा प्रभाव काहींना दुसऱ्या दिवसांपर्यंतही जाणवतो.

४) भांग किंवा लस्सी रिकाम्या पोटी पिऊ नका. भांगेची नशा चढू नये, यासाठी भांग पिण्यापूर्वी अल्पोपहार करण्याची गरज असते. त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. थंडाई किंवा मिल्कशेकसोबत भांग मिश्रित करून प्यायल्याने त्याचा प्रभाव कमी होतो व डोकेदुखी किंवा चक्कर येत नाही.

५) भांग प्यायल्यावर मोकळ्या जागेत फिरा. भांग प्यायल्यावर होणाऱ्या प्रभावामुळे बंदिस्त जागेची भीती वाटू लागते आणि विचित्र भास होऊ लागतात. तसंच मोकळ्या जागेत भांगेचा प्रभाव तितका जाणवत नाही. म्हणून भांग प्यायल्यावर शक्यतो बाहेरच फिरा.

६) भांग प्यायल्यावर गाडी चालवू नका. कोणतीही नशा केल्यावर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्यास मनाई असतेच. भांगेेबाबतही सारखेच आहे. भांगमुळे येण्याऱ्या धुंदीत गाडी चालवणं धोकादायक असतं व अपघात होण्याची शक्यता असू शकते.

7) हृदयाचे विकार व उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी भांग पिऊ नका. हृदयाचे विकार, दम्याचा त्रास किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी भांग कधीही पिऊ नये. कारण त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता होऊ शारीरिक त्रास वाढू शकतो.

८) भांग कधीही मद्यात मिश्रित करू नका.होळीच्या दिवशी काही व्यक्तींना भांग मद्यात मिश्रित करून प्यायची सवय असते. त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी किंवा अंगदुखीसारखा त्रास होऊ शकतात. तसंच मद्यात भांग मिसळल्याने त्याचे शरीरास खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होतात.

९) खूप जास्त पाणी प्या.भांग प्यायल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो म्हणून पाणी पिणं गरजेचं असतं. तसंच भांग प्यायल्याने घसा कोरडा पडतो व शरीराला पाण्याची गरज जास्त असते. म्हणून भांग प्यायल्यावर भरपूर प्रमाणात पाणी प्या.

१०) लहान मुलांपासून व गरोदर स्त्रियांपासून भांग दूर ठेवा. लहान मुलांना मोठ्या माणसांपेक्षा भांगेचा प्रभाव लवकर व जास्त होतो. तसंच गरोदर स्त्रियांनी भांग प्यायल्यास त्यांच्या गर्भावरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणून भांग पिताना या सर्व छोट्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं.