सच्चा समाजवादी, चळवळींचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:42 AM2018-04-03T04:42:12+5:302018-04-03T04:42:12+5:30

भाई वैद्य यांनी शालेय जीवनातच १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या काळात त्यांनी जबर मारहाण आणि तुरूंगवास भोगला. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी १९ महिने तुरूंगवास सोसला.

True Socialist Movements | सच्चा समाजवादी, चळवळींचा आधारवड

सच्चा समाजवादी, चळवळींचा आधारवड

Next

भाई वैद्य यांनी शालेय जीवनातच १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या काळात त्यांनी जबर मारहाण आणि तुरूंगवास भोगला. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी १९ महिने तुरूंगवास सोसला. मूळ पिंड चळवळ आणि संघर्षाचा असल्याने त्यांना तब्बल १५ वेळा कारावास भोगावा लागला. अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून ८८ व्या वर्षी त्यांनी अटक करवून घेतली होती.
शालेय वयापासून समाजवादी विचारधारेशी त्यांची जुळलेली नाळ जीवनाच्या अखेरपर्यंत कायम राहिली. या वयातही युवकांशी संवादी असलेले भाई कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असत. समाजवादी पक्षाची जी जी स्थितंतरे झाली त्यामध्ये भार्इंचा सक्रीय सहभाग होता. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निकटचे सहकारी असलेल्या भाईंनी त्यांच्या ‘भारत यात्रे’मध्ये चार हजार किलोमीटरची पदयात्रा केली होती.
शहराच्या पूर्व भागातून नगरसेवक म्हणून महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भाई वैद्य यांची १९७४ मध्ये पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. महापौरपदाच्या कालखंडात भाई ‘आॅल इंडिया मेयर्स कॉन्फरन्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला विरोध करणारे भाई वैद्य मिसाबंदी म्हणून १९ महिने तुरुंगामध्ये होते. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. जनता पक्षाने जनसंघाबरोबर युती करून स्थापन केलेल्या पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) सरकारमध्ये भाई यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपदाची धुरा आली. महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान सेवा निवृत्तीवेतन आणि त्याची महागाईशी जोडणी करून घेतली.
पुणे महानगरपालिका सेवा निवृत्त संघाचे भाई वैद्य १९७५ पासून अध्यक्ष होते. १९८६ ते १९८८ या काळात ते जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. १९९५ ते १९९९ या कालखंडात ते समाजवादी जनपरिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. १९९८ पासून ते एस. एम. जोशी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष होते. २००० ते २००२ या कालावधीत ते राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. दिल्ली येथील भारत यात्रा ट्रस्टचे २०११ पासून राष्ट्रीय अध्यक्ष होते.

लाच घेऊन आलेल्यांना दाखविला तुरुंगाचा रस्ता
गृहराज्यमंत्री असताना भाईंनी पहिले विधेयक मराठवाडा विद्याापीठाच्या नामांतराचे मांडले. स्मगलरचे सात साथीदार तीन लाख रुपयांची लाच घेऊन आले असताना गृहराज्यमंत्री म्हणून भाई यांनी त्यांना पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात पाठविले. राज्यातील पोलिसांना फुल पँट देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच कारकिर्दीत घेतला गेला.

विपुल लेखन
समाजवादी विचारधारेसंबंधी लेखन, प्रबोधन, संघर्ष आणि संघटन करण्यामध्ये भाई वैद्य यांनी आयुष्य वेचले. एका समाजवाद्याचे चिंतन, मंडल आयोग व अन्य मागासवर्ग, समाजवाद, संपूर्ण शिक्षण : फीविरहित, समान व गुणवत्तापूर्ण; का व कसे?, आर्थिक आक्रमणाचे आरिष्ट (भाषांतरित), परिवर्तनाचे साथी व सारथी आणि शब्दांमागचे शब्द ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.


माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि समाजातील वंचित -उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती लढ्यात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न होते. मुल्यांवर निष्ठा ठेवूनही राजकारण करता येते याचा एक मानदंड त्यांनी निर्माण केला होता.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या आणि स्वातंत्र्यानंतर सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेणाºया जयप्रकाश नारायण, मधू लिमये, एस.एम. जोशी या विचारवंतांसोबत त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा कालावधी घालवला. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि तरुण पिढी यांच्यासमवेत आयुष्य व्यतीत करणाºया भार्इंनी समाजवादी विचाराला शक्ती देण्याचे कार्य केले.
- शरद पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मूल्याधिष्ठित संघर्ष करणारे नेतृत्व हरपले आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास मूल्याधिष्ठित व लोकसेवेसाठी समर्पित होता. विद्यार्थीदशेत ‘चले जाव’ आंदोलनात उडी घेऊन त्यांनी देशसेवा सुरू केली. सर्वसामान्यांची, कष्टकºयांची लढाई लढणाºया भाई वैद्य यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरपला आहे.
- राधाकृष्ण विखे-पाटील,
विरोधी पक्षनेते, विधानसभा

समाजवादी मूल्यांवर निष्ठा ठेवून भाई वैद्य आयुष्यभर चळवळींसाठी कार्यरत राहिले. वयाच्या ८८व्या वर्षीही त्यांनी शिक्षण हक्कासाठी तरुंगवास भोगला. नव्या पिढीसाठी त्यांचे जीवन आदर्शवत होते. ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्याशी त्यांचे घनिष्ठ ऋणानुबंध होते. लोकमत परिवाराशी त्यांचे गहिरे नाते होते. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे.
- विजय दर्डा, चेअरमन,
लोकमत एडिटोरिअल बोर्ड

आपल्याला समजून घेणाºया, आधार देणाºया जुन्या पिढीतील माणसांपैकी एकेक दुवा निखळत चालला आहे, याचे खूप वाईट वाटत आहे. अर्वाच्य, उठवळ भाषेच्या पलीकडे जाऊन भान राखून म्हणणे मांडण्याची सभ्यता भाई वैद्य यांनी कायम राखली. गृहराज्यमंत्री, चळवळीचा मार्गदर्शक असे भार्इंचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजवरच्या समाजकारण, राजकारणाच्या प्रवासाचे ते साक्षीदार होते. आजची परिस्थिती पाहून ते विषण्ण होत असत. या वयातही त्यांनी काम थांबवले नव्हते.
- विद्या बाळ,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

भाई वैद्य यांचा आणि माझा ४५ वर्षांचा परिचय होता. त्यांचा पिंडच कार्यकर्त्याचा होता. समाजवादी विचारांची त्याची बैठक पक्की होती. त्या विचारांवरची श्रद्धा त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही. आमदार झाले, मंत्री झाले पण कधीही सत्तेचा गर्व त्यांना चढला नाही. अत्यंत साधी राहणी हेच त्यांचे वैशिष्ट्य राहिले. सच्च्या व्यक्तीमत्वाला आपण
मुकलो आहे.
- गिरीश बापट,
पालकमंत्री, पुणे

भाई वैद्य यांच्या निधनाने मुल्याधिष्ठीत राजकारणाचा आग्रह धरणारा नेता आम्ही गमावला आहे. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याचे भाग्य मला लाभले. अनेक समाजवादी संघटनांना कृतीशील बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या वैचारिक स्पष्टतेसाठी भाई आग्रही असायचे.
- सुभाष वारे, कार्यकारी विश्वस्त, एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन.

लाच देणारी व्यक्ती त्या रकमेच्या बॅगसह पकडून देणारे भाई ४० वर्षे महाराष्ट्राच्या लक्षात आहेत. अशी माणसे आजच्या पेटी-खोक्याच्या राजकारणात दंतकथा वाटतात. या जागा भरून काढणारी माणसे आता कुठून आणायची, हाच मोठा प्रश्न आहे.
- हेरंब कुलकर्णी,
सामाजिक कार्यकर्ते
 

Web Title: True Socialist Movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.