लोकल प्रवासात प्रत्येक किलोमीटरवर जातो ३ प्रवाशांचा जीव; मध्य, पश्चिम रेल्वेवरील धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:51 IST2025-06-28T20:44:34+5:302025-06-28T20:51:20+5:30
मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणे दिवसेंदिवस जोखमीचे बनले असून, प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर प्रवाशांचा जीव गेला आहे.

२०२४ मध्ये मध्य रेल्वेच्या मार्गावर १,०८२ प्रवाशांचा, तर पश्चिम रेल्वे मार्गावर ७०९ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. दरम्यान, या कालावधीत दोन्ही मार्गाच्या प्रत्येक किलोमीटर अंतरावर अनुक्रमे ३ आणि सरासरी ४ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे.
रेल्वे प्रवास खर्चाच्या दृष्टीने स्वस्त असला तरी तो जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक उपाय योजना केल्या जात असल्याचा दावा रेल्वे करत आहे. रेल्वेने गेल्या १५ वर्षातील दिलेल्या माहितीनुसार, २००९ आणि २०२४ या कालावधीत रेल्वे अपघातात प्रवाशांच्या मृत्यूची संख्या घटली आहे.
पश्चिम रेल्वेवर प्रती किमी मृत्यू ५१ टक्क्यांनी, तर मध्य रेल्वेवर प्रती किमी मृत्यूची संख्या ३९ टक्क्यांनी घटली आहे. मात्र, इतक्या वर्षात हजारो प्रवाशांचा जीव गेला असून, मृत्युदर शून्यावर आणण्यात रेल्वे अपयशी ठरली आहे.
२००९ मध्ये मध्य रेल्वेवर १४६८ तर पश्चिम रेल्वेवर १७८२ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. प्रत्येक किलोमीटरमध्ये पश्चिम रेल्वेवर ५ तर मध्य रेल्वेवर ८ प्रवासी दगावले.
२०२४ मध्ये मध्य रेल्वेवर ७०९ प्रवाशांचा मृ्त्यू झाला तर पश्चिम रेल्वे मार्गावर १०८२ प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रत्येक किलोमीटरमध्ये पश्चिम रेल्वेवर आणि मध्य रेल्वेवर तीन तीन प्रवासी मृत्यूमूखी पडले आहेत.
मध्य रेल्वेच्या मार्गावर पश्चिम रेल्वेच्या तुलनेत सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेचे मार्ग किलोमीटरनुसार जास्त असल्यामुळे प्रती किलोमीटर मृत्यू संख्या कमी दिसते. मात्र, वर्षभरात सर्वाधिक मृत्यू मध्य रेल्वे मार्गावर झाले आहेत.
गेल्या १५ वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. लोकलमधील गर्दी विभागण्यासाठी १५ डबा लोकलच्या फेऱ्यांचा प्रयोग यशस्वी ठरत असतानाही मध्य रेल्वेने फेऱ्या वाढवण्याबाबत हालचाली केल्या नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे, पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकलच्या २११ फेऱ्या धावल्या असताना मध्य रेल्वेवर ही संख्या अवधी २२ इतकी आहे.