1993 मुंबई स्फोटातील दोषींचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 02:35 PM2017-09-07T14:35:43+5:302017-09-07T14:40:04+5:30

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

प्रत्यार्पण कायद्यामुळे अबू सालेमला 25 वर्षांहून जास्त शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही. त्यानुसार त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून यामधील 12 वर्षांची शिक्षा त्याने आधीच भोगली आहे. त्यामुळे अजून पुढची 13 वर्ष त्याला कारागृहात घालवावी लागणार आहेत. मात्र भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केल्यास अबू सालेमला आजन्म जन्नठेपेची शिक्षा होऊ शकते.

करीमुल्लाह खानलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला.

ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हवाला ऑपरेटर राहिलेल्या ताहीर मर्चंटला न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी दोषी धरले होते. हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षित करण्यात आले त्यांच्यासाठी मर्चंटच्या दुबईमधील घराचा वापर झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल वाचनात सांगितले होते. 

फिरोज खानलाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिरोज खानने रायगडमधील दिघी आणि शेखाडी बंदरावर आरडीएक्स उतरवून मुंबईत पाठवणाले होते.

बॉम्बस्फोटाच्या षडयंत्राचा आरोप असलेल्या रियाज सिद्दीकाला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा 28 जून रोजी जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा होता.