मुंबईतीलकुर्ला भागात राजकीय वैमनस्य आणि फेरीवाल्यांच्या वादातून भाजपच्या तीन प्रमुख कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. दुचाकीवरून जात असताना फेरीवाल्यांसोबत किरकोळ वाद झाल्याने ही घटना घडली. या प्रकरणानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘एल’ विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि अतिक्रमणाला खतपाणी घालणाऱ्या घटकांविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर गुन्हेगारी टोळ्यांच्या अनधिकृत मालमत्तांवर बुलडोझर कारवाईचा मार्ग अवलंबण्यात येत आहे.
ज्या परिसरात ही मारहाण झाली, त्या ठिकाणी आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे. पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेत पालिकेच्या पथकांनी अनधिकृत गाळे, टपऱ्या आणि नियमबाह्य बांधकामांवर बुलडोझर चालवून कारवाई केली. या कारवाईदरम्यान परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले असून, वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली.
कुर्ला परिसरात काही फेरीवाल्यांकडून स्थानिक नागरिकांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप होत असताना, अखेर पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.
ही बुलडोझर कारवाई कोणत्याही दबावाखाली नसून ती पूर्णपणे अतिक्रमण निर्मूलनासाठी आहे. बेकायदेशीर बांधकामे हटवणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करणे आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही कारवाई सुरू असून, पुढील काळातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.