Join us

महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 07:48 IST

औद्योगिक क्षेत्राची वाढ व रोजगारनिर्मितीमुळे राज्याचा हिस्सा सर्वात जास्त; ईपीएफओच्या अहवालातून माहिती समोर

-चंद्रकांत दडस, मुंबई महाराष्ट्र देशाच्या सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) २०२३-२४च्या वार्षिक अहवालातून समोर आले आहे. ईपीएफओमध्ये देशभरात  सर्वाधिक सदस्य, आस्थापना आणि पेन्शनधारकांची संख्या महाराष्ट्रात असून, औद्योगिक व रोजगारनिर्मितीमुळे राज्याचा हिस्सा सर्वात जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

२०२३-२४ मध्ये १,१९,७३,४५६ नवीन सदस्य ईपीएफओत आले. त्यातील २२,९७,६७८ सदस्य महाराष्ट्रातील आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक व नागपूरमध्ये रोजगाराच्या नव्या संधींने सदस्यसंख्या झपाट्याने वाढली. 

प्रत्येक ६ कंपन्यांतील एक महाराष्ट्रात

अहवालानुसार २०२३-२४ मध्ये देशभरात २,९४,९१० आस्थापना ईपीएफओच्या कक्षेत आल्या. त्यापैकी ४८,४५६ आस्थापना महाराष्ट्रातील आहेत. 

देशातील जवळपास प्रत्येक ६ आस्थापनांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. या आस्थापनांमध्ये आयटी, उत्पादन, बांधकाम, सेवा व वित्तीय क्षेत्रांचा मोठा वाटा आहे.

पेन्शनधारकांमध्ये महाराष्ट्र देशात पहिला

देशभरात ७८,४९,३३८ पेन्शनधारक आहेत. त्यापैकी १३,१२,८०० महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच, संपूर्ण देशातील प्रत्येक सहावा पेन्शनधारक महाराष्ट्राचा आहे. निवृत्तिवेतन योजनेंतर्गत सर्वाधिक लाभार्थी महाराष्ट्रातील आहेत.

दावे निकाली किती? : महाराष्ट्रातून आरोग्य, घरखरेदी, विवाह व शिक्षण यासाठी सर्वाधिक दावे दाखल झाले.

टॅग्स :महाराष्ट्रमुंबईअर्थव्यवस्थागुंतवणूक