एखाद्याचा जीव गेल्यावर जागे होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:41 IST2023-10-09T13:38:56+5:302023-10-09T13:41:17+5:30
...त्यामुळे येथे एखाद्याचा जीव गेल्यावर यंत्रणा जागी होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

एखाद्याचा जीव गेल्यावर जागे होणार का?
मुंबई : कुर्ला-अंधेरी रोडवरील कमानी सिग्नल येथे मुंबई पालिकेच्या वतीने भूमिगत गटाराचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाचे साहित्य कमानी सिग्नलच्या कडेला कित्येक महिन्यांपासून पडून आहे. याठिकाणी कामाचा राडारोड पडलेला आहे. त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले असून, रात्री येथे अवजड वाहने उभी केली जातात. त्यामुळे येथे एखाद्याचा जीव गेल्यावर यंत्रणा जागी होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
कमानीपासून बैलबाजारपर्यंतची वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा रस्ता निमुळता असून, वाहतूक वाढल्याने पादचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे अपघाताची भीती आहे.
यांना जीवाचे काहीच पडलेले नाही...
काळे मार्गावरील दुहेरी वाहतूक सुरू करण्यासाठी कित्येक पत्रव्यवहार केले आहेत. बैल बाजारातील रस्त्याच्या अडचणीबाबत कायमच पालिकेला स्मरण केले आहे. गेल्या काही वर्षांत काळे मार्गावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यंत्रणा एवढी सुस्त झाली आहे की, त्यांना मुंबईकरांच्या जीवाचे काहीच पडलेले नाही.
- ॲड. राकेश पाटील, कुर्ला