लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:57 IST2025-09-13T12:55:19+5:302025-09-13T12:57:45+5:30
लायसन्ससाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने लायसन्स काढू शकतो. यासाठी रहिवासी पुरावा आणि परीक्षा फी भरून काही प्रश्नांची उत्तरे दिल्यावर लगेच लायसन्स मिळते.

लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
-महेश कोले, मुंबई
परिवहन विभागाकडून (आरटीओ) अर्जदारांना वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या ‘लर्निंग लायसन्स’च्या प्रक्रियेत बदल करणे आवश्यक असून, केवळ कागदपत्रे आणि ऑनलाइन चाचणी पुरेशी नसल्याचे राज्याचे परिवहनमंत्री सरनाईक यांनी शुक्रवारी सांगितले. मुंबई सेंट्रल आरटीओच्या भेटीदरम्यान या प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लायसन्स टेस्टमध्ये हलगर्जीपणा न करण्याची तंबीही त्यांनी दिली.
लायसन्ससाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने लायसन्स काढू शकतो. यासाठी रहिवासी पुरावा आणि परीक्षा फी भरून काही प्रश्नांची उत्तरे दिल्यावर लगेच लायसन्स मिळते; परंतु या प्रक्रियेतील पळवाटांमुळे गैरवापर होत असल्याचा सरनाईक यांना अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.
काहींनी तर माकडांचे फोटो लावून, खोटी नावे देऊन लर्निंग लायसन्स मिळवल्याचे प्रकार होत असल्याचे ते म्हणाले. अनेक उमेदवार तर गाडी कशी चालवावी हे माहिती नसतानादेखील केवळ लर्निंग लायसन्सच्या जोरावर रस्त्यांवर हुल्लडबाजी करतात. त्यामुळे ते स्वतःचा, तसेच इतरांचा जीवदेखील धोक्यात घालत असल्याने लायसन्स जारी करण्याच्या प्रक्रियेच्या वेळेस त्यांचे प्रबोधन करण्याचे निर्देश दिले.
‘लोकमत’च्या वृत्ताचा दाखला; हलगर्जीपणा नको
काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने आरटीओ कार्यालयांमध्ये एजंटच हे निरीक्षक म्हणून पक्क्या लायसन्सची चाचणी घेत असल्याचे वास्तव समोर आणले होते. याचा दाखला देत रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने लायसन्स प्रक्रिया महत्त्वाची असून, त्यात हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना सरनाईक यांनी सर्व निरीक्षकांना दिल्या.
आरटीओ अधिकाऱ्यांनाच प्रक्रिया माहीत नाही?
लर्निंग लायसन्स जारी करणाऱ्या दोन सहायक मोटार वाहन निरीक्षकांना प्रताप सरनाईक यांनी प्रक्रिया विचारली. दरम्यान, वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेताना सोबत पक्के लायसन्स असलेली व्यक्ती आवश्यक असावी की नाही याबद्दल विचारले. त्यावेळी निरीक्षकांनी नाही असे उत्तर दिले. मुळात पक्के लायसन्स असलेला व्यक्ती सोबत असणे अपेक्षित असताना चुकीचे उत्तर दिल्याने मंत्री सरनाईक यांनी त्यांची कानउघाडणी केली.