मुंबईकर ठरणार का पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत? तुमचा प्लास्टिकचा कचरा ठरतोय पृथ्वीच्या अंताचे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 08:40 IST2026-03-09T08:40:34+5:302026-03-09T08:40:57+5:30
पाण्यामध्ये तळाला जाऊन बसणारे आणि तरंगणारे प्लास्टिक या परिसंस्थेमधील वनस्पतींसाठी त्रासदायक तर ठरतेच, परंतु प्राणीसृष्टीच्याही विनाशाचे कारण ठरत आहे.

मुंबईकर ठरणार का पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत? तुमचा प्लास्टिकचा कचरा ठरतोय पृथ्वीच्या अंताचे कारण!
अविनाश कुबल
निसर्ग अभ्यासक
'दी ओशियन क्लीनअप’ या नेदरलँडच्या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील ५० लाख किलो प्लास्टिक समुद्रात फेकले जाते. पाण्यात गेलेले हे प्लास्टिक अनेक वेळा समुद्राच्या तळाशी जाऊन बसते. तर त्यातील बहुतांशी भाग समुद्रातील प्रवाहामार्फत समुद्रात इकडे तिकडे पसरतो.
पाण्यामध्ये तळाला जाऊन बसणारे आणि तरंगणारे प्लास्टिक या परिसंस्थेमधील वनस्पतींसाठी त्रासदायक तर ठरतेच, परंतु प्राणीसृष्टीच्याही विनाशाचे कारण ठरत आहे. प्लास्टिकचा शोध लागण्यापूर्वी सर्व प्रकारच्या उपयोगासाठी वनस्पतिजन्य तंतू-कापूस आणि इतर प्रकारच्या वनस्पतिजन्य तंतुमय वस्तूंचा प्रामुख्याने वापर होत होता. परंतु, कालांतराने हळूहळू त्याचा वापर कमी होऊन त्यांची जागा प्लास्टिकने घेतली. आता प्लास्टिकचा कचरा समुद्रात जात आहे आणि समुद्रातील पर्यावरणीय प्रक्रियांसाठी आवश्यक सूक्ष्मजीवांच्या आणि मध्यम व मोठ्या प्राण्यांच्या विनाशाचेही कारण ठरत आहे.
प्लास्टिकचा समुद्रामध्ये जाणारा तिसरा घटक म्हणजे मायक्रो प्लास्टिक अर्थात प्लास्टिकची भुकटी आणि तिचे अतिसूक्ष्म कण. हे कण समुद्री जिवांच्या अस्तित्वाला अतिधोकादायक ठरत आहेत. कारण जलीय परिसंस्थेतील प्राण्यांना श्वसनासाठी लागणारा ऑक्सिजन मिळविण्यासाठी ते प्रत्यक्षरीत्या पाण्याचा वापर करतात. परिसंस्थेमधील पाणी शरीरात ओढून त्यामधला ऑक्सिजन शोषून घेऊन उर्वरित पाणी ते बाहेर सोडतात. त्यावेळी शरीरात ओढल्या गेलेल्या पाण्यासोबत हे अतिसूक्ष्म प्लास्टिक कण त्यांच्या शरीरात जातात आणि साठून राहतात. त्याचे अतिगंभीर दुष्परिणाम आढळतात.
प्लास्टिकचे हे प्रदूषण समुद्री परिसंस्थेमध्ये अत्यंत घातक बदल घडवून आणत आहे. समुद्रातील पाण्याचे चयापचय नीट होत नसल्यामुळे पाण्यातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढू ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्याचबरोबर पाण्यामधील वनस्पतींची वाढ कमी होत असल्यामुळे पाण्यातील ऊर्जा वापरली जात नाही. परिणामी समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत आहे. त्याचा सर्वांत जास्त घातक परिणाम म्हणजे सूर्यप्रकाशातील ऊर्जेमुळे पाण्याची होणारी अतिरिक्त वाफ. समुद्रसपाटीच्या भागातून वाफेची निर्मिती होऊन हवेमधील बाष्प यामुळे ढगांची निर्मिती प्रचंड वाढत आहे. हे ढग जमिनीकडे आल्यानंतर जेव्हा त्यांचे रूपांतर पावसात होते, तेव्हा हवेतील ओलावा अथवा दमटपणा प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे पावसाची तीव्रता भयानक स्वरूप धारण करते. त्यातून अतिवृष्टी होते. एकूण काय तर पृथ्वीतलावरील पर्यावरण प्लास्टिकमुळे बाधित होऊन हळूहळू विनाशाकडे जात आहे.