Join us  

वाहनचालकांनी दंड न भरल्यास वाहन परवाना होणार रद्द?; राज्यात ७०० कोटींचे ई-चलन थकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:57 AM

मुंबईकर आहेत आघाडीवर

मुंबई :  वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करतात. पण वाहनचालकांनी दंड न भरल्यास वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. राज्यात ७०० कोटी रुपयांहून अधिक वाहतूक नियम उल्लंघन केलेला दंड थकीत आहे, त्यापैकी मुंबईतील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुमारे २८० कोटी रुपये म्हणजे सुमारे ४० टक्के रक्कम थकली आहे. 

याबाबत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, वाहतूक नियम उल्लंघन गुन्हे शून्यावर आणणे सोपे काम नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये गुन्हा करणाऱ्या चालकाची ओळख पटत नाही. या नोटीस सहसा वाहन मालकाला बजावल्या जातात आणि काही प्रकरणांमध्ये पत्ते योग्य नाहीत किंवा दिलेला मोबाइल क्रमांक चुकीचा असतो. आपल्या प्रणालीतील डेटा गुणवत्ता चिन्हापर्यंत नाही.

अनेक अडथळे असले तरी येत्या काही दिवसांत चांगल्या वसुलीसाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याची परिवहन विभागाची योजना आहे. गरज पडल्यास आम्ही चुकीच्या वाहनचालकांचे परवाने तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित करू ते रद्द करू, असेही त्यांनी सांगितले.

ई-चलन आकारण्यास अडचणी

आरटीओ विभागाने दोन महिन्यांपासून ई-चलन सुरू केले आहे. वाहनचालक आता पाकिटे, क्रेडिट/ डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग वापरून कोणत्याही स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरून ई-चलन दंड भरू शकतात. वाहन निरीक्षक वाहन थांबवून कारवाई करतात. वाहतूक निरीक्षक स्पीडगन किंवा सीसीटीव्हीव्दारे करत नाहीत. त्यामुळे एक कारवाई करत असताना दुसरी वाहने निघून जातात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दंड असा आकारला जातो

आरटीओच्या नियमानुसार, वाहतुकीच्या गुन्ह्यानुसार दंडाची तरतूद आहे. गुन्ह्याच्या प्रमाणानुसार वेगवेगळा दंड आहे, तसेच गुन्ह्याची पुरावृत्ती झाल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होते. वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्याला १५ दिवसांच्या आत ई-चलन दंड भरावा लागतो. १६व्या दिवसापासून पैसे देण्यास विलंब केल्याबद्दल प्रतिदिन १० रुपये दंड आकारला जातो. 

टॅग्स :वाहतूक पोलीसपोलिस