Join us  

राज्यात भाजपा-शिवसेना एकत्र येणार? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं सध्याचं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 4:06 PM

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते तर सुरुवातीपासूनच, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकित नेहमीच वर्तवत आहेत. याबाबत सोशल मीडयावरही चर्चा रंगली असून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे

ठळक मुद्देभाजपा-शिवसेनेची गेल्या 30 वर्षांपासूनची युती होती. हिंदुत्व आणि देशप्रेमांचा धागा पकडून ही युती होती. मी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे, वरिष्ठ काय चर्चा करतात हे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 'आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय' असा पवित्रा घेऊन काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिलाय. त्यामुळे आघाडीत सारं काही आलबेल आहे का आणि पुढे राहील का, याबद्दल उलटसुलट चर्चा आहे. आता, त्या दिशेनं एक पाऊल पुढे पडलं असून राज्यात पुन्हा युती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती 'लोकमत'ला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आरक्षण आणि राज्यातील अन्य काही प्रश्नांबाबत ही भेट होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हेही त्यांच्यासोबत होते. पण, या भेटीपेक्षा, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड झालेल्या भेटीचीच चर्चा जास्त रंगली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.  त्या पार्श्वभूमीवर, दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात गेल्या पाच-सात दिवसांत ४० मिनिटं फोनवर चर्चा झाल्याचं समजतं. या चर्चेदरम्यान मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर भाजपाचा सत्तास्थापनेचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती दिल्लीतील उच्चपदस्थ सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते तर सुरुवातीपासूनच, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकित नेहमीच वर्तवत आहेत. याबाबत सोशल मीडयावरही चर्चा रंगली असून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण चर्चा होत असतात, एक दिन की चर्चा... चर्चा पे चर्चा... होतात. मी माझ्या अनुभवावरुन एक गोष्ट सांगू इच्छितो, चर्चा होत असेल तर चर्चेतून काही निष्पन्न होत नाही. व्हायचं असेल तर ते गुप्तपणे होतं, त्याची माहितीही बाहेर पडत नाही. मला आज तरी, आजच्या वातावरणात भाजपा-शिवसेना एकत्र येतील, असे वाटत नाही. 

भाजपा-शिवसेनेची गेल्या 30 वर्षांपासूनची युती होती. हिंदुत्व आणि देशप्रेमांचा धागा पकडून ही युती होती. मी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे, वरिष्ठ काय चर्चा करतात हे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु, सध्याचं वातावरण पाहता, ही चर्चा गंभीरतेनं घ्यावी, असे मला वाटत नाही, असे सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :शिवसेनासुधीर मुनगंटीवारराजकारणभाजपानरेंद्र मोदी