मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
By अतुल कुलकर्णी | Updated: June 30, 2025 05:15 IST2025-06-30T05:14:38+5:302025-06-30T05:15:21+5:30
आज दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी नेमके काय करायचे?, संघटनात्मक बदल करायचे की नाही?

मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
मुक्काम पोस्ट महामुंबई
अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई
आज दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी नेमके काय करायचे?, संघटनात्मक बदल करायचे की नाही?, महापालिका निवडणुकीला सामोरे कसे जायचे?, यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. भाजपने तर मुंबई, ठाण्यात महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची, कोणत्या वॉर्डातून कोणाला उभे करायचे, याची चाचपणीही पूर्ण करत आणली आहे. एवढेच नव्हे, तर मुंबईत महापालिका निवडणुकीची संचालन समितीही जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही शिवसेना तयारीला लागल्या आहेत. शिंदेसेनेने मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या पक्षात पक्षप्रवेश सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असे म्हणत वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप सांगेल तसे निर्णय घेईल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईत फारसा प्रभाव नाही. एकही नगरसेवक जवळ नसताना राज ठाकरे यांच्या मनसेने स्वतःविषयी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांच्याविषयी इतर नेत्यांना आणि इतर नेत्यांविषयी वर्षा गायकवाड यांना अनेक आक्षेप आहेत. ज्या बाळासाहेब थोरात यांच्याविषयी नेत्यांचे एकमत होऊ शकते, ते कुठेही दिसत नाहीत. मुंबईत काँग्रेसकडे खा. वर्षा गायकवाड यांच्यासह चंद्रकांत हंडोरे, आ. अमीन पटेल, आ. ज्योती गायकवाड, मधु चव्हाण, नसीम खान, अमरजीतसिंह मनहास, भाई जगताप, असलम शेख, चरणसिंग सप्रा असे दहा खेळाडू दाहीदिशेला तोंड करून उभे आहेत. पक्ष आपल्याला विचारत नाही, म्हणून माजी मंत्री सुरेश शेट्टी प्राण्यांचे फोटो काढत जंगल भ्रमंती करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात विरोधकांची बाजू खंबीरपणे लावून धरणारे सचिन सावंत यांचा वापर करावा असे पक्षाला वाटत नाही. सगळे पक्ष कामाला लागलेले असताना, मुंबई काँग्रेसने शनिवारी एक समन्वय समिती स्थापन केली. त्यातून जगताप, सप्रा, नसीम खान, हंडोरे यांना दूर ठेवले आहे. अशा स्थितीत मुंबईत काँग्रेस महापालिका निवडणुकीला कशी सामोरी जाणार याचे उत्तर दिल्लीच्या बैठकीतून तरी मिळेल का?
मुंबईत काँग्रेसच्या सहा जिल्ह्यांत एकमेकांची तक्रार करणे, एकमेकांचे पाय खेचणे या व्यतिरिक्त दुसरे विषय अजेंड्यावर नाहीत. मुंबई काँग्रेसच्या ऑफिसमध्येही फार हालचाल दिसत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घाटकोपरला पक्षाचे शिबिर घेतले. उद्धव ठाकरेंनी किमान तीन-चार बैठका घेतल्या असतील. मात्र, काँग्रेसला अशा गोष्टींची गरज वाटत नसावी.
मराठीसारखा मुद्दा सरकारकडून आयता चालून आलेला असताना राज, उद्धव दोघांनीही यावरून जोरदार भूमिका घेतली. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षाने मोर्चामध्ये सक्रिय सहभागाची भूमिका जाहीर केली. मुंबई काँग्रेसने मात्र इतक्या चांगल्या विषयाला खेचून स्वतःकडे घेण्याची चांगली संधी घालवली. मुस्लीम मतदान आपल्याला मिळेल, असा दावा काँग्रेसचे नेते करत असले, तरीही केवळ तेवढ्या मतांवर मुंबईत किती नगरसेवक निवडून येतील?, उलट तसे चित्र भाजपला हवेच आहे. त्यातून धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची बेगमी करता येते, हे विधानसभेत ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्याने सिद्ध केले आहेच. त्यातूनही काँग्रेसला काही धडा घेता आलेला दिसत नाही.
ठाण्यात काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, रायगडमध्ये महेंद्र घरत हे दोन स्थानिक नेते वगळले, तर बाकी सगळे सुशेगात आहे. पालघरमध्ये औषधालाही काँग्रेस उरलेली नाही. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी आज होणाऱ्या बैठकीत तरी फायनल होईल का, हा एक प्रश्नच आहे. कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये वेगवेगळी पदे देऊन खूश करण्यापलीकडे काँग्रेसच्या हातात दुसरे काहीही नाही. ती पदे देतानाही ‘अभ्यास चालू आहे’, अशी उत्तरे मिळत असतील, तर या काँग्रेसचे करायचे काय?, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतले सर्वधर्मीय प्रार्थना स्थळावरील भोंगे काढायला लावून एक वेगळा महाराष्ट्र पॅटर्न तयार केला आहे. कुठेही कसलाही गाजावाजा न करता मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांना सूचना देत त्यांनी ही मोहीम फत्ते केली आहे. या अशा गोष्टींचा निवडणुकीत भाजप कशा पद्धतीने उपयोग करून घेऊ शकते, हे काँग्रेस नेत्यांच्या लक्षात येत नाही असे नाही. एकीकडे सत्ताधारी भाजप प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक गोष्टीत आघाडी घेत असताना, काँग्रेसने मात्र अजून निवडणूक प्रचार सुरू करण्यासाठी नारळ, उदबत्तीही आणलेली दिसत नाही.