मुंबईकरांची वाहने जाताहेत तरी कुठे? चोरीचे २,२९९ गुन्हे; निम्म्या गुन्ह्यांचे गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:50 IST2026-01-23T11:49:43+5:302026-01-23T11:50:15+5:30
शहरात वाहन चोरीचे वाढते सत्र चिंताजनक

मुंबईकरांची वाहने जाताहेत तरी कुठे? चोरीचे २,२९९ गुन्हे; निम्म्या गुन्ह्यांचे गूढ कायम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत दिवसागणिक घडणाऱ्या वाहन चोरीच्या घटना डोके वर काढत आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईत वाहन चोरीचे २,२९९ गुन्हे नोंद झाले. यापैकी १,३५७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. दिवसाला ५ ते ६ वाहने चोरीच्या घटना घडत आहेत.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात मुंबईत एकूण ६४ हजार १२ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी ५१,५५९ गुन्ह्यांची उकल झाली. यामध्ये दिवसाला पाच ते सहा वाहन चोरीच्या घटनांमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढत आहे. वाहन चोरीचे एकूण २,२९९ गुन्हे नोंद असून त्यापैकी अवघ्या निम्या गुन्ह्यांची उकल झाली. २०२४ मध्ये हाच आकडा २,५८९ होता. २०२४ च्या तुलनेत गुन्हे कमी असले तरी यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.
चोऱ्यांचे प्रमाण वाढतेच
मुंबई शहराबरोबरच उपनगरांतही दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. मुंबई शहरात अंधेरी, जोगेश्वरी तसेच मालाड परिसरात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. तर वसई विरार शहरातही दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
चोरीच्या गाड्यांची परराज्यात होते विक्री
मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये मोटार वाहन चोरी विरोधी पथक बंद करण्याचा निर्णय घेतला. हे पथक मालमत्ता कक्षात विलीन करण्यात आले आहे. मुंबईतून चोरी होणाऱ्या बहुतांश गाड्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटकमध्ये नेण्यात येतात. तसेच मुख्यत्वेकरून चोरी केलेल्या गाड्यांचाच गुन्हे करण्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे एखादी वाहनचोरांची टोळी पकडली गेल्यास किमान १० ते १५ गुन्ह्यांची उकल होत असल्याचे पोलिस कारवाईतून दिसून आले आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासासाठी वेगळ्या पथकाची आवश्यकता आहे.
भंगारात पार्टची विक्री
रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्यांचे सुटे भाग मुंबईसह मुंबई बाहेर विक्री करतात. मुंबईतही बरेच गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी करतात. तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजिन नंबर लावत त्यांची विक्री करतात. भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचे. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून त्या दुचाकीची चोरी करायचा. अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकड़ून वेळोवेळी कारवाई होत आहे. तर काही ठग सोशल मीडियावर देखील दुचाकी विकतात.