महेश कोले
मुंबई : मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सुरक्षा व्यवस्था अभेद राखण्यासाठी बसवलेले बॉडी आणि बॅग स्कॅनर बंद आहेत. त्यामुळे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या स्थानकात मेल-एक्स्प्रेस आणि लोकल प्रवाशांची २४ तास वर्दळ असते; परंतु या स्थानकात येणाऱ्या व्यक्तींची आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली जात नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सीएसएमटी येथून दररोज १८०० उपनगरी लोकल, सुमारे २०० पेक्षा अधिक एक्स्प्रेस सुटतात. या स्थानकातून दररोज ५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकातील बॉडी आणि बॅगेज स्कॅनर बंद पडल्याने नवीन यंत्रांची ऑर्डर देण्यात आली आहे; परंतु कंत्राटदार बदलल्याने ते येण्यासाठी अजून अवधी आहे. तोपर्यंत सुरक्षेची जबाबदारी पोलिस आणि आरपीएफवर असणार आहे.
प्रवासी काय म्हणतात?सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी या स्थानकात येतात. त्यांच्या सोबत बरेचसे सामान असते; परंतु यावर रेल्वेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांच्या माध्यमातून अवैध वस्तूंची वाहतूक तसेच घातपात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन मध्य रेल्वेने यावर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. त्यांच्यावर आरपीएफ आणि पोलिसांमार्फत २४ तास नियंत्रण राखणे शक्य नसल्याने बॉडी आणि बॅग स्कॅनद्वारे तपासणी वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.