CM Devendra Fadnavis: "परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढवण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा," असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.
परिवहन सेवेला गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. जुनी १३ हजार शासकीय वाहने भंगारात काढली जावी अशा सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, टॅक्सी, ऑटो, शहर बस सेवेच्या तिकीट दरासंदर्भातही निर्णय घेण्यात यावेत. वडसा-गडचिरोली तसेच सोलापूर-धाराशीव येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे. राज्य परिवहन सेवेच्या १५ वर्षे झालेल्या बसेस भंगारात काढून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. यंत्रणा बसविण्यात यावी जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.
दरम्यान, घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर अभियांत्रिकी उपाययोजना शोधून काढावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.