प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून मार्चपर्यंतची डेडलाइन निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:38 IST2026-02-05T16:33:28+5:302026-02-05T16:38:22+5:30
प्रभादेवी रेल्वे पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वेने हाती घेतले असून, आतापर्यंत पुलाच्या स्पॅन-३ चे पाडकाम पूर्ण झाले आहे. त्यात सात पॅनेल आणि दोन गर्डर पूर्णपणे हटविले आहेत. त्याकरिता २२ तासांचे ब्लॉक घेतले आहेत.

प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून मार्चपर्यंतची डेडलाइन निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: प्रभादेवी रेल्वे पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वेने हाती घेतले असून, आतापर्यंत पुलाच्या स्पॅन-३ चे पाडकाम पूर्ण झाले आहे. त्यात सात पॅनेल आणि दोन गर्डर पूर्णपणे हटविले आहेत. त्याकरिता २२ तासांचे ब्लॉक घेतले आहेत. रेल्वे वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, अशा पद्धतीने नियोजन करून हे काम केले आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पूल मार्चपर्यंत पूर्णपणे पाडण्याचे लक्ष्य आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेचे ब्लॉक अजून ठरत नसल्याने त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात झालेली नाही.
प्रभादेवी पुलाचे पाडकाम करून तेथे दुमजली पूल उभारण्याचा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) आहे. रेल्वेच्या हद्दीतील काम ‘महारेल’ करत आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील भागातील पाडकाम सुरू झाले असून, यासाठी दोन तासांचे एकूण सात ब्लॉक (१४ तास) आणि चार तासांचे दोन ब्लॉक (आठ तास) ब्लॉक घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कालावधीत चारपैकी एका मार्गिकेवरचा पुलाचा भाग हटविला आहे. तसेच स्पॅन-२ चे पाडकाम शिल्लक आहे.
पुनर्बांधणीच्या टप्प्यावर दृष्टिक्षेप
पाडकामानंतर पुढील टप्प्यात एंड-टू-एंड पियर कॅपचे कास्टिंग ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर २०२६ मध्ये नवीन गर्डरचे एंड-टू-एंड लाँचिंग होईल. रेल्वेचा टीडीसी भागही डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
‘वाहतूक नियोजनासाठी काम सुरू’
रेल्वे भागात पुलाचा १३२ मीटरचा भाग असून, त्यापैकी सर्वाधिक भाग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो. सहा रुळांवरून हा पूल जातो. यासाठी ब्लॉक घेताना वाहतूक बंद ठेवणे आव्हानात्मक असल्याने त्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे अद्याप ब्लॉक ठरविला नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.