देशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:02 AM2019-01-22T06:02:48+5:302019-01-22T06:03:02+5:30

जन्मोजन्मी एकच पती मिळावा, अशी संस्कृती सांगणाऱ्या भारतीय परंपरेतील पती-पत्नीच्या नात्यातील वीण उसवू लागली आहे.

Weaving in the financial capital of the country | देशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण

देशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण

Next

- जमीर काझी 
मुंबई : जन्मोजन्मी एकच पती मिळावा, अशी संस्कृती सांगणाऱ्या भारतीय परंपरेतील पती-पत्नीच्या नात्यातील वीण उसवू लागली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घटस्फोटाचा आलेख वाढत चालला असून, गेल्या पाच वर्षांत मुंबईत तब्बल ३४ हजार ५२३ जोडपी विभक्त झाली आहेत. सरत्या वर्षात तब्बल ७ हजार ६०८ दाम्पत्यांनी विभक्त होण्यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे.
बदलती जीवनशैली, चंगळवाद व राहणीमानामुळे घटस्फोटाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पाच वर्षांत ३६ हजार ४१६ जोडप्यांनी घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली. त्यापैकी ३४ हजार ५२३ जोडपी विभक्त झाली आहेत, तर ११ हजार ४११ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी रोज सरासरी २१ अर्ज दाखल होत असून, स्त्री व पुरुषांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. महिलांमध्ये विशेषत: नोकरी करणाºया, स्वत:च्या पायावर उभ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे.
१ जानेवारी, २०१४ ते ३१ डिसेंबर, २०१८ या कालावधीत तब्बल ३६ हजार ४१६ जणांनी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे. त्यामध्ये एकतर्फी, तसेच परस्पर संमतीने विभक्त होण्याचे प्रमाण अनुक्रमे ७० व ३० टक्के इतके असल्याचे उघड झाले आहे.
२०१८ मध्ये विभक्त होण्यासाठी ७,६०८ जणांनी अर्ज दाखल करण्यात आले होते, तर ६,८५१ प्रकरणे निकालात निघाली आहेत. २०१७ मध्ये त्याचे प्रमाण अनुक्रमे ७,५१८ व ६,८८० इतके होते. २०१४, २०१५ व २०१६ मध्ये घटस्फोटासाठी अनुक्रमे ७,२५०, ६,९५२ व ७,०८८ इतके खटले दाखल झाले होते.
>बदलती जीवनशैली, सोशल मीडिया ठरतोय मारक
बदलेली जीवनशैली,राहणीमान, सोशल मीडियाचा वाढता वापर घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहे. आर्थिक सबलतेमुळे नोकरदार दाम्पत्य पटत नसल्यास संमतीने परस्परापासून दूर होत आहेत. पतीचे विवाहबाह्य संबंध हे विभक्त होण्याचे मुख्य कारण होत असे. आता त्यामध्ये महिलांचे प्रमाणही वाढत आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटरमुळे घरबसल्या जगातल्या कोणत्याही कानाकोपºयातील व्यक्ती संपर्कात येते, त्यातून सोशल मीडियाचा अतिवापर विवाह संस्कृतीला मारक ठरत आहे. - अ‍ॅड. सिद्धार्थ शहा, ज्येष्ठ विधिज्ञ व समुपदेशक
>... म्हणूनच जोडप्यातील विसंवादात वाढ
एकत्रित कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा आदरयुक्त धाक होता. ते पती-पत्नीतील वाद, दुरावा मिटवित असत. मात्र, सद्या नोकरदार जोडपी, अपुरी जागा आदी कारणांमुळे त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या कुटुंबात वाद मिटण्यापेक्षा चव्हाट्यावर येतात. त्यांना समजावून सांगणारी व्यक्ती नसल्याने घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होत आहे.
- अ‍ॅड. रवि जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ

Web Title: Weaving in the financial capital of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.