लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले की, मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम करीत आहोत. यामध्ये मोतीलाल, जीटीपीनगर येथे समूह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ४,९०० रहिवाशांना घरे मिळणार आहेत.
कामाठीपुरा, अभ्युदयनगर येथील समूह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, सप्टेंबर २०२५पर्यंत ती पूर्ण होईल. ११ हजार ४११ भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे. आदर्शनगर, वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे क्लस्टरचा लाभ २,०१० रहिवाशांना होणार आहे. त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे. वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत करणार आहोत. एकूण सदनिकांपैकी २५ टक्के सदनिकांचे वाटप डिसेंबर २०२५पर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे शिंदेंनी सांगितले.