Join us  

आम्हाला महाराष्ट्राची काळजी; चालू प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 4:30 AM

मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पाटील प्रदेश कार्यालयात आले होते.

मुंबई : आम्हाला महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे. जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही, पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल. त्यानंतर निर्णय घेतले जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पाटील प्रदेश कार्यालयात आले होते.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आम्ही सगळी माहिती घेत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचे नाही, अशी आमची वृत्ती नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याबाबत माहिती घेऊ, असे सांगतानाच ४० हजार कोटी रुपयांबाबत भाजपच्याच खासदारांनी वक्तव्य केल्यामुळे लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.भिमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना आमचे सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. कोणते गुन्हे गंभीर आहे. कोणत्या गुन्ह्यामध्ये जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ््याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातील, असेही पाटील यांनी सांगितले. अजून खातेवाटपाबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे मी कुणाला पाठिशी घालतोय, असा प्रश्नच उद्भवत नाही. गुन्हे आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल. गैरसमज पसरवू नये. सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत, असेही पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना सांगितले.

टॅग्स :जयंत पाटील