Join us  

गोरेगावमधील धबधबा ठरतो पर्यटकांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 5:34 PM

गोरेगाव (पूर्व) येथील नागरी निवारा 1 व 2 समोरील डोंगरातील हिरवळ व पावसाळ्यात दिमाखात धो धो वाहणारा उपनगरातील एकमेव धबधबा तो देखील मुंबईत आहे...

मनोहर कुंभेजकर

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील नागरी निवारा 1 व 2 समोरील डोंगरातील हिरवळ व पावसाळ्यात दिमाखात धो धो वाहणारा उपनगरातील एकमेव धबधबा तो देखील मुंबईत आहे, हे ऐकून तर मुंबईकर व पर्यटक आश्चर्य व्यक्त करतात. गोरेगाव (पूर्व )रेल्वे स्थानकावरून 346 व 646 बसने नागरी निवारा 1 व 2 च्या शेवटच्या थांब्यावर उतरल्यावर समोर व मीनाताई ठाकरे उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या जय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरावर  उगम पावणाऱ्या वलभट नदीतून दरवर्षी पावसात हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो. गेले दोन चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तर हा पांढरा शुभ्र धबधबा ओसंडून वेगाने वाहत आहे. दर शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी या धबधबाचा आनंद लुटण्यासाठी डोंगर चढून पर्यटक येथे गर्दी करतात.मात्र यंदा कोरोनामुळे पर्यटकांना या धबधबाचा आनंद लुटता येणार नाही. या ठिकाणी पर्यटन स्थळ उभारण्यासाठी आणि येथील धबधबा वाचवण्यासाठी राज्याचे पर्यटन,पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे व स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आणि येथील धबधबा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 3 डिसेंबर 2018 रोजी येथील डोंगराच्या सुमारे 4 किमी परिसराला मोठी आग लागली होती.त्यावेळी सोशल मीडियावर येथील आगीची दृश्ये व्हायरल झाली होती.सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडला येथील आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले होते.या डोंगराला आग लावण्यात आली होती असा अहवाल फायर ब्रिगेडने दिला होता.युती सरकारचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या डोंगराला भेट दिली होती,मात्र सदर अहवाल बासनात गुंडाळून ठेवल्याचे समजते. विकासकाने येथे बांधकाम करून चक्क इन्फिनिटी आयटी पार्कच डोंगरावरच उभारल्यामुळे येथील 30 ते 40 टक्के हा निसर्गाचा आविष्कार असलेला डोंगर आणि धबधबा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत साद प्रतिसाद या संस्थेचे संस्थापक व पर्यावरण प्रेमी संदीप सावंत यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

येथील निसर्गरम्य परिसर म्हणजे मिनी महाबळेश्वर होते. खळखळणारा धबधबा आणि वृक्षवल्लीने नटलेली हिरवाई पावसाच्या आगमनाने येथील निसर्ग पुन्हा बहरतो. राखेने काळाकुट्ट झालेला डोंगरमाळ पुन्हा हिरव्या गालिचाने बहरतो. पण आज या डोंगराची काय स्थिती आहे याकडे कोण लक्ष्य देणार  निसर्गाचा ऱ्हास कोण थांबणार, असा सवाल साद प्रतिसादच्या वतीने संदीप सावंत यांनी केला आहे. गोरेगावमधील नागरी निवारा परिषद आणि म्हाडा वसाहती मागील नॅशनल पार्कचा डोंगरातील वन्यजीवन, वृक्षवल्ली, औषधी वनस्पती नामशेष होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

वलभट नदी उगम पावते तो थील निसर्गरम्य परिसर ना विकास क्षेत्र व संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात येतो. तरी तेथील वृक्ष संपदा जाणीवपूर्वक नष्ट होत असून, येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील नागरी वस्तीजवळ असलेला हा निसर्गाचा आविष्कार असलेला धबधबा वाचवायला हवा. येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आणि येथील धबधबा यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन साद प्रतिसाद या स्वयंसेवी संस्थेने केले आहे. 

टॅग्स :पर्यावरणमुंबई मान्सून अपडेटमुंबईकोरोना वायरस बातम्या