- योगेश जंगममुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईलाही आता पाण्याची समस्या भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती आणि महत्वाच्या अंधेरी पूर्व येथे मोठ्या प्रमाणावर विविध कंपन्यांची कार्यालये आणि व्यापारी गाळे आहेत. यासह याठिकाणी रहिवासी वस्तीही मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र रहिवासी वस्तीला कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. अंधेरी पूर्व येथील गुंदवली, पंपहाऊस, मोगरापाडा, आंबेवाडी, ख्रिश्चनवाडी, डीसिल्वा वाडी, मरोळ शिवाजी नगर, पंचशील नगर, भंडारवाडा तर जोगेश्वरीतील शंकरवाडी येथील लोकवस्तीला सध्या पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. अंधेरी पूर्व येथे महापालिकेचे के पूर्व कार्यालयही आहे, मात्र या कार्यलच्या शंभर मीटरच्या आत असलेल्या गुंदवली परिसरामध्येही पाण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने रहिवासी बेहाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पवई जलाशयाच्या येथे मोठ्या पाईप लाईनच्या दुरूस्तीचे काम करण्यात येत आहे, हे काम अजून काही दिवस चालणार असल्याने काही भागांमध्ये पाणी पुरवठा कमी प्रमाणामध्ये होत असल्याचे महापालिकेच्या जल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
यंदा कमी पडलेला पाऊस, अनधिकृत जलजोडणी, टँकर माफिया, पाणी गळती, जुन्या-गंजलेल्या पाईप लाईन आणि सध्या असलेली पाणी कपात यामुळे बहुतांश भागांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने अंधेरी पूर्वमध्ये आता पाणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. रहिवाशांना पाण्यासाठी वनवण फिरावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यात अथवा उपाययोजना राबवून समस्या दूर करण्यात महापालिकेला अदयाप तरी अपयश आले असल्याचे दिसत आहे. यामुळे महापालिकेने मुंबईला चोविस तास पाणी पुरवठा करण्याचा केलेला दावा फोल ठरताना दिसत आहे.
जगण्यासाठी अत्यावश्यक म्हणजे पाणी, मात्र ही अत्यावश्यक सेवा पुरवण्यास महापालिकेला का कुठे कमी पडत आहे किंवा नेमके कारण काय याचा विचार महापालिकेने करण्याची गरज आहे. अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व येथे कमी दाबाने पाणी पुरवटा होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी अजिबात पाणी पुरवठा होत नसल्याने दुसऱ्या भागांतून पाणी भरावे लागत आहे. आधीच तापमानामध्ये कमालीची वाढ झाली असल्याने दुपारच्या सुमारास दुसºया भागातून पाणी भरताना रहिवासी हैराण होत आहेत. पाण्याची कमतरता असल्याने विद्यार्थांसह ज्येष्ट नागरिकही पाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अंधेरीतील कार्यालये आणि व्यावसायिक गाळ्यांना व्यवस्थित पुरवठा होत असताना येथील चाळी आणि रहिवासी विभागालाच कमी पाणी पुरवठा का ? असा सवाल संपप्त रहिवाशांमार्फत उपस्थित करण्यात येत आहे.