Join us  

लोकांच्या समस्येचं निराकरण गावातच, चक्क राज्यमंत्रीच 'राहुटी' घेऊन येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:08 PM

राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचीत आहेत.

मुंबई - प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि राज्यमंत्रीबच्चू कडू आता राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात हा उपक्रम राबवत आहेत. 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 15 दिवसांच्या कालावधीसाठी मतदारसंघात हा उपक्रम घेण्यात येत असून थेट मंत्रीमहोदयच लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात, घरापर्यंत पोहोचणार आहे. यापूर्वी आमदार असतानाही कडू यांच्याकडून हा उपक्रम राबविण्यात येत होता. आता, मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही त्यांनी ही सेवा सुरुच ठेवली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचीत आहेत. सर्वसामान्य, गरिब अन् दिव्यांग व्यक्तींसाठी हे प्रसंगी सनदी अधिकाऱ्यांच्या अंगावरही धावून जातात. त्यामुळे, प्रशासनात कडू यांचा वेगळाच दबदबा आहे. आमदार असताना कडू यांनी आपल्या मतदारसंघात ''आमदाराची राहुटी आपल्या गावात'' ही योजना राबवली होती. त्यांची हीच योजना आता राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात अशी बनली आहे. 

कडू यांच्या मतदारसंघातील गावोगावी गेल्या 15 वर्षांपासून म्हणजेच 2005 पासून राहुटी हा उपक्रम नेण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी तब्बल 55,000 प्रकरणाचा यामध्ये निपटारा करण्यात आला. आत्तापर्यंत 7 शासकीय यात्रेत लाखो लोकांचे शासकीय काम करण्यात आले आहे. सर्व 36 कार्यालय टेम्पोमध्ये गावोगावी पोहचतात. यावर्षी हाच उपक्रम 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात कडू यांच्या मतदार संघात होणार आहे. आमदारांची राहुटी आपल्या गावात हा उपक्रम, आता राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात या नावाने गावोगावी पोहोचणार आहे. गावातील लोकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी थेट मंत्रीमहोदयच गावात फिरणार आहेत. राहुटी म्हणजे काय ?

"राहुटी" तसा हा शब्द जुनाच आहे परंतु काळानुरूप हा शब्द लोप पावला. ब्रिटीश काळात दळणवळणाचे साहित्य नसल्याने अधिकारी, कर्मचारी हे गावातील लोकांचे काम करायला गावात तंबु टाकुन मुक्काम करत असे. यालाच "राहुटी" असे म्हणतात.

टॅग्स :बच्चू कडूअचलपूरमंत्री