विधानभवन बोगस पास: पाच जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक; मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:35 IST2026-03-27T13:27:32+5:302026-03-27T13:35:19+5:30
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी बोगस पास विकल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, यात मंत्रालय आणि विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विधानभवन बोगस पास: पाच जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक; मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश
विधिमंडळ अधिवेशन काळात प्रवेश पास दिले जातात. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोगस पास विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये मंत्रालयातील दोन आणि विधानभवनातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधानभवनात बनावट पासचा वापर करून प्रवेश केल्याच्या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. दत्तात्रय गुंजाळ याने मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार असल्याचे बनावट पासवर लिहिलेले होते.
या प्रकरणात मंत्रालयातील दोन आणि विधानभवनातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस यांनी दाखल झालेल्या गुन्ह्यात दत्तात्रय गुंजाळ (वय ५३), शिपाई गणपत भाऊ जावळे (वय ५०), नागेश शिवाजी पाटील (वय ४२), लिपिक मनोज आनंदा मोरबळे (वय ४०) आणि स्वप्निल रमेश तायडे (वय ४०) यांना अटक केली आहे. या प्रकरणात मंत्रालयातील महेश दुंपलवार आणि लावेश शंकर नकाते हे सध्या फरार आहेत.
#BREAKING: Five people arrested for using a fake pass to enter the Maharashtra Legislative Assembly during the budget session. The pass, given to Dattatray Gunjal, falsely stated 'Chief Minister's Office Advisor.' The arrested include two ministry employees and two Assembly… pic.twitter.com/En1Ny2xYbY
— IANS (@ians_india) March 27, 2026
बॉम्ब धमकीमुळे प्रवेशाचे नियम कडक
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच विधानभवनात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी दिली गेली होती. हा मेल मिळाल्यानंतर सर्वत्र झाडाझडती घेण्यात आली. या प्रकरणानंतर विधानभवनात प्रवेश करण्याचे नियम अधिक कठोर करण्यात आले.
याचदरम्यान, विधानभवनात प्रवेश करण्यासाठी बोगस पास विकले जात असल्याचा मुद्दा आमदारांकडून उपस्थित करण्यात आला. २००० ते ५००० रुपये घेऊन बनावट पास दिले जात असल्याचे समोर आले. काही शिपायांनी हे पास दिले असल्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते.
आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रवेश पासबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. काही संघटनेचे कार्यकर्ते विधानभवनात दिसले. सभागृहातील एका दालनात जेवले, पूर्णवेळ पासेस मिळवल्या आणि काही पुस्तके वाटली. पासेस पूर्णपणे बंद असताना देखील हे प्रचारक आत कसे? असे मिटकरींनी म्हटले होते. त्यामुळे अधिवेशन काळात विकल्या जाणाऱ्या बोगस पासचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.