Join us  

Video : सोमवारपासून लालपरी धावणार, शहरात अडकलेल्यांना फुकटात गावी सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 4:57 PM

एकाच जिल्ह्यात किंवा गावी जाणाऱ्या लोकांनी २२ जणांची एक यादी करून यादी पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी

मुंबई - राज्यभरात अडकलेल्या विद्यार्थी, मजूर व नागरिकांच्या घरवापसीसाठी प्रशासनाने मार्ग खुला केला आहे. त्यांना रीतसर परवानग्या देण्यात येत आहे. खासगी वानधारकांकडून होणारी प्रवाशांची लूट लक्षात घेता महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून ही मोफत बससेवा सुरु करण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले. 

एकाच जिल्ह्यात किंवा गावी जाणाऱ्या लोकांनी २२ जणांची एक यादी करून यादी पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. यामध्ये त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायाचे आहे, याची माहिती लिहायची आहे. २२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण सांगतील, त्यानंतर डेपोत येऊन बसमधून गावाला जायचे आहे. मुंबई आणि पुण्यातील कन्टोनमेंट झोनमधील नागरिकांना या बसने प्रवास करता येणार नाही. तसेच १८ मे पर्यंतच ही बससेवा सुरु राहणार आहे. त्यानंतर, राज्य सरकारच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, या बसवरील नोंदसाठी ऑनलाईन पोर्टलही सुरु करण्यात येत असून सोमवारपासून ते उपलब्ध होईल. या ऑनलाईन पोर्टलद्वारेही आपणास नोंदणी करता येईल. 

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाने परिपत्रक काढून सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यभरात नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी राहणारे विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी एसटी बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत. ज्या गावात, शहरात प्रवासी जाण्यास तयार होतील, तिथेच बस सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन प्रवासाचा मार्ग आणि शेवटचे ठिकाण ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवासामध्ये कुठेही बस थांबणार नाही. त्यामुळे एका ठिकाणाहून निघालेली बस ठरविलेल्या शहर, गावातच थांबेल, वाटेमध्ये कोणत्याही प्रवाशास उतरण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

टॅग्स :अनिल परबबसचालकस्थलांतरणपुणेमुंबई