Join us

प्रकाश आंबेडकर सागर बंगल्यावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, तासभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:59 IST

Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis: परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटीची नुकसान भरपाई, एका सदस्याला शासकीय नोकरी, अशा काही प्रमुख मागण्या प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.

Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis: बीड आणि परभणी प्रकरणावरून विरोधक महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यातच मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे परभणी आणि बीड दौऱ्यावर जाणार असून, सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या भेटीचे नेमके कारण काय, याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. बीड आणि परभणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट महत्त्वाची समजली जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या प्रमुख मागण्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली आहे. परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे, असेही ते म्हणाले. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत?

- परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी; 

- सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या; 

- परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा;

- १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत, 

- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरदेवेंद्र फडणवीसपरभणी