Join us  

Waris Pathan: देशात मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय, बैठकीनंतर एमआयएम आमदार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 4:14 PM

एमआयएमचे नेते आणि मुंबईतील आमदार वारिस पठाण हे या बैठकीला उपस्थित होते

मुंबई - राज्यात मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न तापलेला असताना या मुद्द्यावर राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे भाजपने पाठ फिरवली होती. भोंग्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. पण, या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंऐवजी मनसेचे बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित राहिले. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या अंमलबजावणीवर सर्वांचे एकमत झाले. मात्र, मनसेचे नेते त्यांच्या 3 मे पर्यंतच्या अल्टीमेटमवर ठामच राहिले.

एमआयएमचे नेते आणि मुंबईतील आमदार वारिस पठाण हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्याच्या वातावरणावर भाष्य केलं. ''मुस्लिमांना संपूर्ण देशात टार्गेट केलं जात आहे. तुम्हाला, मला सर्वांना माहितीय, आपण पाहतोय, आज देशातील 6 ते 7 राज्यांमध्ये मुस्लीम नागरिकांना कुठं व्यवसायातून, कुठं हिजाबच्या नावावरुन, जहाँगीरपुरीमध्ये कुठल्याही नोटीसशिवाय मुस्लीमांची घरे तोडली. एका विशिष्ट समुदायास लक्ष्य केलं जात आहे, यातून चांगला संदेश जात नाही,'' असे मुंबईतील एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी म्हटलं. 

बैठकीत काय घडलं, मेनन यांनी सांगितलं

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लाऊडस्पीकरच्या डेसिबल मर्यादेवरच या बैठकीत मुख्य चर्चा झाली. त्यामध्ये, सर्वच पक्षांचे त्यावर एकमत होते. मात्र, देशातील वातावरण काही वेगळंच आहे. कारण, देशात विविध धर्मांचे लोकं जागरण, किर्तनही करत असतात. त्यामुळे, राज्य सरकारला काही अपवादात्मक निर्णयही घ्यावे लागतात. मनसेच्या भूमिकेनुसार 3 मे पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू करावा अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे, सर्वच धर्माच्या लोकांसाठी हा नियम लागू राहिल. यासंदर्भात मनसेला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कुठेही सहकार्य करायला तयारी नाहीत. मनसेनं मागणी करणं योग्य आहे, पण धमकी देणं अयोग्य आहे, असे आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रिती मेनन यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.  

राज ठाकरे दुसऱ्यांचा आवाज बनले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत:चा आवाज बोलत नाहीत, ते कोणाचा तरी आवाज बनले आहेत. राज ठाकरेंसारखा नेता असा कोणाच्यातरी आवाजातून बोलत असेल तर ते त्यांच्या फॉलोअर्ससाठी अवघड बनतं. म्हणूनच, मनसेतून मोठ्या संख्येनं आमच्या पक्षात येण्यासाठी लोकं दररोज संपर्क करत आहेत, अनेकजण पक्षातही आले आहेत. कारण, त्यांना वाटतंय त्यांच्या नेत्याची दिशाभूल झाली आहे, असे प्रिती शर्मा मेनन यांनी म्हटलं आहे. तसेच, भाजपने या बैठकीला उपस्थित न राहून चुकीचा मेसेज दिला आहे. तसेच, या बैठकीला उपस्थित न राहून या दंगलसदृश्य परिस्थितीमागे भाजपच असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय, असेही यांनी म्हटलं.  

टॅग्स :ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनमुंबईवारिस पठाणमुस्लीममनसे