३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:12 IST2026-04-06T12:09:07+5:302026-04-06T12:12:41+5:30
रविवारी सकाळी ७ वाजता दीक्षितच्या वडिलांनी सहार पोलिसांकडून क्लिअरेन्स सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे अवशेष ताब्यात घेतले.

३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
मुंबई - ओमानच्या किनाऱ्याजवळ तेल टँकरवर झालेल्या मिसाइल हल्ल्यामुळे मृत्यू पावलेल्या कांदिवली येथील खलाशी दीक्षित सोळंकी यांचे जळालेले अवशेष रविवारी पहाटे शारजाहहून मुंबईला आणण्यात आले. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षात बळी पडलेल्या भारतीयांपैकी ते एक आहेत. मात्र जोपर्यंत डीएनए चाचणीतून दीक्षित यांची ओळख पटत नाही तोवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबाने नकार दिला आहे.
सोमवारी सोळंकी कुटुंबाच्या वकिलांनी डीएनए मागणीसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. सरकारने या प्रकरणात कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये डीएनए चाचणीसाठी नमुने पाठवावे अशी मागणी कुटुंबाने केली आहे. एका मुलाखतीत वकिलांनी अवशेष शब्दाचा वापर केला. हे कुठलेही शरीर अथवा मृतदेह नव्हते असं वकिलांनी सांगितले. तर ज्या जहाजावर हल्ला झाला तिथे केवळ एकच जीवितहानी झाली, ज्याची ओळख पटवण्यात आल्याचे शिपिंग मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. हे अवशेष एका कार्गो उड्डाणाने मुंबईत आणले गेले. दीक्षितचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यात दीक्षितचे अवशेष लवकरात लवकर परत आणण्याची मागणी होती. दीक्षितच्या मृत्यूला एक महिना उलटल्यानंतर ही याचिका करण्यात आली. त्यानंतर ३ दिवसांनी अवशेष घेऊन ताबूत मुंबईत पोहचले.
रविवारी सकाळी ७ वाजता दीक्षितच्या वडिलांनी सहार पोलिसांकडून क्लिअरेन्स सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे अवशेष ताब्यात घेतले. त्यानंतर कुटुंब या अवशेषाची ओळख पटवण्यासाठी त्याची डीएनए चाचणी व्हावी यासाठी ते जे.जे हॉस्पिटलला घेऊन गेले. आम्हाला डीएनए चाचणी हवी आणि त्यासाठी आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत असं खलाशी दीक्षितची बहीण मिताली यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान, आम्हाला डीएनए चाचणी सकारात्मक आल्याचे कोणतेही लेखी दस्तऐवज देण्यात आलेले नाही. त्यामुळे खात्री झाल्यावरच आम्ही अवशेषांवर अंत्यसंस्कार करू अशी भूमिका दीक्षित यांच्या कुटुंबाने घेतली आहे. सोळंकी कुटुंब मूळचे दीवमधील घोगला येथील असून ते सध्या ते कांदिवलीतील महावीर नगर येथे राहतात अशी माहिती स्थानिक चारकोप पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.