Join us  

‘उडाण’अंतर्गत सव्वातीन लाख प्रवाशांनी केला हवाई प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 4:25 AM

राज्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे.

- खलील गिरकरमुंबई : सर्वसामान्य व्यक्तीला हवाई प्रवास करणे सोपे व्हावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘उडे देश का आम नागरिक’(उडाण) या योजनेंतर्गत राज्यात ३० आॅक्टोबरपर्यंत ५ हजार उड्डाणे झाली असून, त्याद्वारे सव्वातीन लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमद्वारे ‘उडाण’ योजना राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार व भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाद्वारे राबविण्यात आलेल्या या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे.राज्यात वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर या विमानतळांवरून विमानसेवा सुरू केली आहे. या योजनेत सहभागी झाल्यावर राज्य सरकारकडून विस्तारासाठी विनामूल्य जमीन, विनामूल्य सुरक्षा व अग्निशमनसेवा उपलब्ध करून देण्यात येते. विमान कंपन्यांना देय असलेल्या व्हीजीएफमधील २० टक्के हिस्सा राज्य सरकार देते. याशिवाय वीज, पाणी व इतर सुविधांवर ५० टक्के सवलत, विमानाच्या इंधनावर १ टक्के किंवा त्याहून कमी कर आकारणी, विमान कंपन्यांना एअरपोर्ट लँडिंग व पार्किंग चार्जेसमध्ये सवलत देते.‘उडाण’ योजनेमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांचा औद्योगिक विकास वेगाने होण्यास हातभार लागेल व मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला. ३० आॅक्टोबरपर्यंत सव्वातीन लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेतील प्रस्तावित जल विमानतळासाठी चंद्रपूरजवळील ईरई तलाव व नागपूर रामटेक येथील खिंडशी तलाव या दोन जागा प्रस्तावित असून, त्याबाबत अभ्यास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. उडाणच्या दुसºया टप्प्यात सिंधुदुर्ग, गोंदिया, अमरावती, रत्नागिरी विमानतळे समाविष्ट करण्यात आली असून, त्यापैकी सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ मार्च, २२ अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :विमान