Join us  

'उद्धव ठाकरेंचा यू टर्न, नक्की हे सरकार चालवतय कोण?'; शिवसेना मुखपत्रातूनच 'पोलखोल' उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:50 PM

Uddhav Thackeray: मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण, राज्य सरकारचा निर्णय या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

ठळक मुद्देसामना, शिवसेना आणि ठाकरे हे कधी वेगळं होऊ शकत नाहीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारताच निर्णय घोषित करतात का? - भाजपा

मुंबई -  राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी सोडली नाही. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतल्याने सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर तोंडसुख घेण्यासाठी भाजपा नेते आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुस्लीम आरक्षणावरुन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना लवकरच आरक्षण देण्यासाठी कायदा करु अथवा त्याबाबत अध्यादेश काढू अशी भूमिका सभागृहात मांडली. सभागृहात ठाकरे सरकारच्या मंत्र्याने मांडलेली भूमिका अधिकृत कामाकाजाचा भाग मानला जातो. नवाब मलिकांची ही भूमिका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पहिल्या पानावर मांडण्यात आली. 

मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण, राज्य सरकारचा निर्णय या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका वेगळी होती. मुस्लीम आरक्षणाचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही, त्यामुळे यावर भूमिका मांडण्याचा प्रश्नच नाही. ज्यावेळी हा मुद्दा माझ्यासमोर येईल त्यावेळी मी भूमिका मांडेन असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. मात्र उद्धव ठाकरेंच्या मुस्लीम आरक्षण भूमिकेवरुन भाजपाने ट्विटरवर पोस्ट टाकत शिवसेनेला टोला लगावला आहे. या ट्विटसोबत सामनाचा वृत्तपत्राचा फोटो जोडण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा यू टर्न असं सांगत चार दिवसांपूर्वीच सामनामध्ये आलेली बातमी आणि आजची बातमी याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनेतेने काय घ्यायचा? राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारताच निर्णय घोषित करतात का? नक्की हे सरकार चालवतंय कोणं? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 

'सामना'बाबत काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. सामना, शिवसेना आणि ठाकरे हे कधी वेगळं होऊ शकत नाही. संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. अनेकदा शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून माझी भूमिका, माझे मुद्दे, विचार सामनातून येत असतात, ते येतच राहतील असं त्यांनी सांगितले होते. 

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका आणि सामना वृत्तपत्रात छापून आलेल्या दोन बातम्या यामुळे भाजपाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे आगामी काळात ठरेल. 

महत्त्वाच्या बातम्या

महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी? संजय राऊतांच्या 'या' ट्विटचा नेमका अर्थ तरी काय?

भाजपाचे 13 ते 14 आमदार आमच्या चांगल्या संबंधात, जयंत पाटलांचा 'दे धक्का'

'हे' ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस; काँग्रेस नेत्याचा भाजपाला टोला

कोरोनाच्या काळजीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!

भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प

 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुस्लीमनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना