मुंबई: विधानसभेची चूक पुन्हा करू नका. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा. आपण जी कामे करून दाखवली, ती महायुती सरकारने कशी घालवून दाखवली, हे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना दिले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मुंबईतील विभाग प्रमुख आणि सर्व २२७ शाखा प्रमुखांच्या दोन बैठका रविवारी शिवसेना भवनमध्ये घेतल्या. यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला पूर्ण राज्यात २० जागांवर समाधान मानावे लागले, तर बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना ५७ जागांवर यश मिळाले होते.
‘मुंबईत भगवा फडकवायचा आहे’आपल्याला मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, असे सांगतानाच विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांनी शाखांना भेटी देण्यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करा. महाविकास आघाडीच्या काळात मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मुंबईकरांना दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा आणि महायुती सरकारच्या काळात कशा सुविधा कमी झाल्या हे जनतेपर्यंत जाऊ द्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
जनतेशी संपर्क ठेवा, गाफील राहू नका !उद्धवसेनेचे २० पैकी १० आमदार एकट्या मुंबईतून निवडून आल्याने आता त्यांची सगळी भिस्त मुंबईवर आहे. मुंबई महापालिका उद्धवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना संबोधित करताना ‘विधानसभेची चूक पुन्हा करू नका,’ असा दम भरला आणि जनतेशी संपर्क ठेवा, गटप्रमुख, पोलिंग एजंट, मतदार याद्या तयार ठेवा. जनतेशी संपर्क ठेवा, गाफील राहू नका, असा सल्ला दिला.