Uddhav Thackeray Live Mumbai: यांचे केंद्रात सरकार आल्यानंतर पनवती लागलेली आहे. सगळ्या कामांची वाट लागलेली आहे. एअरपोर्टचे छत गळत आहे. मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे. प्रयागराजला माणसे चेंगरून गेली. कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर माणसे चेंगरून गेली, त्याचीही जबाबदारी कुणी घेत नाही. काल परवा विमान अपघातात माणसे गेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. म्हणजेच काय गांभीर्याने विचार केला तर, आज आपल्या देशाला पंतप्रधानाची गरज आहे. हे पंतप्रधान देशाचे नाहीत, भाजपाचे पंतप्रधान आहेत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. भाजपा, शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली. हे वातावरण आणि असे प्रेम कोणाच्याही भाग्यात लिहिले असेल, असे वाटत नाही. अर्थात ही माझी पुण्याई नाही. ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे आणि तुमचे अतोनात प्रेम आहे. येथील जयघोष विरोधांनी पाहिला, तरी नॅपकिनसकट सगळे कपडे ओले होतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
शिवसेना संपत कशी नाही, उद्धव ठाकरे संपत कसा नाही
पक्ष फोडला, चिन्ह चोरले, बाप चोरला. आता आमचे लोक नेत आहेत. शिवसेना संपत कशी नाही, उद्धव ठाकरे संपत कसा नाही, असा प्रश्न या लोकांना पडला आहे. शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून शिवसेना नावाचे वादळ तयार केले आहे. पैसे फेकून तयार केलेली माणसे नाही, कट्टर शिवसेना धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत. ५९ वर्ष पक्षाला झाली, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. शिवसेना आजही तरुण आहे आणि तरुणच राहणार आहे. मला खरच कीव येते, जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात पोरे होत नाही, अशी लोक आपल्या घराणेशाहीवर टीका करत आहेत. आमच्याकडून किती पोरे घेऊन जायची, तेवढी घेऊन जा, या शब्दांत पक्षातील गळतीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला.
आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू
भाजपा असाच आहे. निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींना केलेला वादा, जनतेला केलेला वादा पक्ष पाळत नाही. याच पक्षाने आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा वादा केला होता आणि हे सांगत होते की, हे सगळे घडलेच नाही. मग तुम्ही आता निवडणुकीत जनतेला केलेला वादा खरा होता की खोटा होता? यातूनच यांची वृत्ती कळते. आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. जो कोणी हा देश मानतो, त्यासाठी कुर्बानी द्यायला तयार असेल, ते आमचेच आहेत. यांना नावेही बरी सुचतात, ‘ऑपरेशन सिंदूर’. पण भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते. कर्नर सोफिया कुरैशी यांच्याबाबत विधान करणाऱ्या विजय शाहाला चापकाने फोडून काढले पाहिजे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.