Join us

“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 08:17 IST

Uddhav Thackeray News: मुंबई किंवा महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का? याचा प्रयत्न अजूनही केला जातो आहे. हे प्रयत्न थांबत नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचे काम थांबणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला.

Uddhav Thackeray News: विंचू चावला हे एकनाथ महाराजांचे भारुड आहे. तोतया एकनाथांचे नाही. पूर्वी एका चित्रपटात गीत होते की, जगात नाही राम रे, दाम करी काम. ते आत्ता असते तर भाजपावल्यांनी बंदी घातली असती. म्हणाले असते की, हा जगात नाही राम म्हणतो. पण त्याच्या पुढची ओळ महत्त्वाची आहे, दाम करी काम. आत्ताही तशीच स्थिती आहे. एकीकडे जय श्रीराम म्हणायचे आणि पैसे देऊन धुमाकूळ घालायचा, हे या नासलेल्या लोकांच्या सरकारमध्ये चालले आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

आपल्या राज्याची जी काही संस्कृती आहे, त्याचा आपला विसर पडत चालला आहे. हिंदी सक्ती मुंबईचे महत्त्व मारण्याच्या निमित्ताने होत आहे. परंतु, त्यांना संपवेपर्यंत शिवसेनेचे काम थांबणार नाही. नोकऱ्या नाहीत. ट्रम्प दम भरताहेत. पहलगामच्या हल्ल्याचे काय झाले त्याचे उत्तर नाही. मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली. तरी त्यांचे सगळे छान चालले आहे. तोंडाने रामराम म्हणून पैसे देऊन धुमाकूळ घालणारे संस्कृतीचा नाश करीत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...

एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि नाव यासंदर्भातील याचिकेवरून थेट देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना साकडे घातले. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना धन्यवाद द्यायचे आहेत. देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यांनी जाहीर केले की, स्वतः त्यात लक्ष घालेन. याला म्हणतात कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश. त्याच सरन्यायाधीशांना मी विनंती करतो आहे की, तो खटला न्यायालयात दाखल झाल्यापासून आपण चौथे सरन्यायाधीश आहात. लोकशाहीच्या तोंडात न्यायाचे पाणी जर नाही घातले तर देशाची लोकशाही मरेल. त्यामुळे आपण त्यातही ही लक्ष घाला ही मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो आहे. आपल्या न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडते आहे. तीन ते चार वर्षे झाली ती कधी प्राण सोडेल माहीत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, इतर प्रश्न आहेत. पण आमचे लक्ष भरकटवले जाते आहे. मुंबईचा लचका किंवा महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का? याचा प्रयत्न अजूनही केला जातो आहे. हे प्रयत्न जोपर्यंत थांबत नाहीत असे प्रयत्न करणाऱ्यांना आपण संपवत नाही तोपर्यंत शिवसेनेचे काम थांबणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराजकारण