Join us  

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: 'लावा रे ते फटाके'; उद्धव'दादू'चा 'राजा'ला त्याच्याच शैलीत टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 6:13 PM

एनडीएला देशभरात मिळत असलेल्या आघाडीनंतर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

मुंबई- एनडीएला देशभरात मिळत असलेल्या आघाडीनंतर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात सेना-भाजपाच्या नेतृत्वानंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन  करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि रामदास आठवले मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हटके पद्धतीनं आनंद व्यक्त केला आहे. पत्रकारांनी राज्यभरात शिवसेनेचा होत असलेला विजयाबद्दल विचारले असता, ते म्हणाले लाव रे फटाके. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओला, लाव रे ते फटाक्यांनी प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे. बाळासाहेबांचा आशीर्वादही आम्ही घेतलेला आहे. बाळासाहेब आणि मुंडे आमची प्रेरणा होती. मोदींनी विश्वासाची परंपरा महाराष्ट्रात रुजवल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या हितासाठी एकत्र राहू, लोकांनी आम्हाला भरघोस मतं दिली आहेत. आपण सुरू केलेलं कार्य वेगानं पुढे कसं न्यायचं यासाठी आमचा अजेंडा ठरलेला आहे. जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठवू. देशामध्ये आम्ही विकासावर बोललो. आम्ही सकारात्मक प्रचार केला, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. मोदी चौकीदार असल्याचा हा तर जनतेनं दिलेला नारा आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजपा 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित बहुजन आघाडीनं एका जागेवर आघाडी मिळवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेच्या प्रस्थापितांना जनतेने नाकारलं असलं तरी हातकणंगले, कोल्हापूर उस्मानाबाद, पालघर या जागा जिंकून उद्धव ठाकरेंनी ती तूट भरुन काढली आहे. शिरुर, अमरावती, रायगड हे मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निघून गेले मात्र इतर जागा जिंकल्याने शिवसेनेशी सरशी झाली आहे. मावळमध्ये शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना हरवून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी गड शाबूत ठेवला. मात्र शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभूत केला. अमरावती मतदारसंघात आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात नवनीत राणा यांनी कडवी झुंज देत शिवसेनेकडून हा मतदारसंघ खेचून घेतला.  

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019उद्धव ठाकरेभाजपा