लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती करण्याची इच्छा असेल तर दोन भावांनी बोलले पाहिजे. त्यांनी एकमेकांना फोन करावा. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही, असे मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमित ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार मनसेने मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ‘खिळेमुक्त’ वृक्ष अभियान राबविले. दादर-माहीम मतदारसंघातून अभियानास सुरुवात झाली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नेते नितीन सरदेसाई, मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृगांरपुरे आदी उपस्थित होते.
यापूर्वीही सहकार्याची भाषा झाली आहे !
युतीसंदर्भात चर्चा फक्त बाहेरच होत आहेत. दोन भाऊ एकत्र येत असतील तर काही इश्यू नाही. २०१४, २०१७ ला, कोरोनाकाळातही आम्ही त्यांना पाहिले आहे. कोरोनाकाळात तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून राज यांनी ‘हा भीषण आजार आहे. त्यामुळे सरकार कोणतेही असो आपण साथ दिली पाहिजे’ असे म्हटले होते. याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली.