Join us  

तुळशी आणि विहार भरले; बाकीचे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 3:18 PM

पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार  आहे.

 

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणा-या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव भरले असून, अद्यापही ५ तलाव भरण्याचे शिल्लक आहेत. पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार  आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडत नाही तोवर मुंबईकरांना जलसंकट राहणार आहे.विहार तलाव ५ ऑगस्‍ट रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे.पावसाळ्यामध्‍ये जून व जुलै महिन्‍यात मुंबईस पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्‍यवृष्‍टी झाली आहे. यामुळे जुलै महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात मुंबईस पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्‍ये फक्‍त सुमारे ३४ टक्‍के जलसाठा उपलब्‍ध आहे. सदर जलसाठा जुलै २०१९ मध्‍ये ८५.६८ टक्‍के व जुलै २०१८ मध्‍ये ८३.३० टक्‍के होता. मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्‍यासाठी पाणीपुरवठ्यात ५ ऑगस्‍टपासून २० टक्‍के पाणीकपात करण्‍यात आली आहे.--------------------------तलाव कमाल किमान सध्या उपयुक्त (दशलक्ष लिटर्समध्ये)अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९४.४४ ५९७.५७ ५०,१९८मोडक सागर १६३.१५ १४३.२६ १५४ ५९,६४८तानसा १२८.६३ ११८.८७ १२३.०२ ५१,१८६मध्य वैतरणा २८५ २२० २६३.५० ८०,७५३भातसा १४२.०७ १०४.९० १२५.३५ ३,२२,६२८विहार ८०.१२ ७३.९२ ८०.३८ २७,६९८तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.४८ ८०४६(तलाव पातळी मिटर्समध्ये)

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबईपाऊसमुंबई महानगरपालिका