मुंबईतील प्रवास हाेणार जलद, साेपा; वाहतूक सेवेतील एकात्मिक पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:01 IST2025-01-19T07:01:14+5:302025-01-19T07:01:41+5:30
एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईतील प्रवास हाेणार जलद, साेपा; वाहतूक सेवेतील एकात्मिक पाऊल
मुंबई : सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ ३०० ते ५०० मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा झाली. या बैठकीत ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि महामुंबई मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, मुंबईसाठी लोकल रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीमुळे प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी जलद व सुलभ होणार असून, महसूल वाढीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल.
प्रणालींचे एकत्रीकरण
तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे प्रवाशांना सहजगत्या एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व वाहतूक सुविधा मिळतील. यामुळे वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आणखी लोकल सेवा
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मुंबईत सध्या ३५०० लोकल सेवा आहेत. आणखी ३०० सेवांसाठी १७,१०७ कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वे करणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये १.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.